“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १०

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १०

————————————————————————-

मतांचं ‘ध्रुवीकरण’ करण्यासाठी ‘आखरी रास्ता’ म्हणून, ज्या घृणास्पद व संतापजनक पद्धतीने भाजपाई नेत्यांचा, प्रामुख्याने नरेंद्र मोदींचा, देशात धार्मिक दंगली किंवा दंगलप्रवण वातावरण निर्माण करण्याचा, अश्लाघ्य प्रयत्न आटोकाट चाललेला दिसतोय…तो पहाता, त्यांना ‘कमळा’ऐवजी ‘खंजीर’ हीच निशाणी द्यायला हवी…कारण, त्यांनी २५ वर्षांचा ‘दोस्तपक्ष’ असलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आता असं घातकी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करुन ‘भारतमाते’च्याच पाठीत खंजीर खुपसू पहातायत…म्हणूनच, ‘खंजीर’ तरी किंवा अगदी चुलीची-भट्टीची नाही; तर, निदान ‘काडेपेटी’ची तरी निशाणी, यांना ‘कमळा’ऐवजी द्यायलाच हवी. काडेपेटीला साजेसे यांचे, आग लावायचेच धंदे…घराघरात, गावागावात, राज्याराज्यात, संपूर्ण देशभरात आगी लावून मजा बघत…त्या आगीवर, आपली राजकीय-पोळी भाजून घेणारे, हे विकृत ‘आगलावे’ आहेत म्हणूनच!

उत्तर प्रदेशानंतर, लोकसभेच्या सर्वात जास्त जागा असणाऱ्या महाराष्ट्राचा निकालच, केंद्रात कुणाची सत्ता येणार, याबाबत निर्णायक ठरणार आहे… अशा आणीबाणीच्या आणि अटीतटीच्या प्रसंगी, खंबीर उभं राहत, महाराष्ट्रातल्या उद्धव ठाकरे नावाच्या ढाण्या वाघाने दिल्लीश्वरांना आवाज दिलाय, जबरदस्त तगडं आव्हान दिलंय…आजुबाजुचे बुरुज ढासळत असताना किल्ला लढवणं, हे सोपं होतं?…नाहीतर, आजुबाजुला आपण बघतोच आहोत, “आली रे आली भागाबाई” तसं, “आली रे आली रे ईडी-आयटीची नोटीस बाई” की, यांची पळापळ व भागमभाग आणि दिल्लीश्वरांसमोर “घालिन लोटांगण वंदीन चरण”, सुरु! …आणि, तरीही त्या ढाण्या वाघाच्या, उद्धवजींच्या, मूळ-असली शिवसेनेलाच ‘नकली’ म्हणता?

‘एक अकेला सब पे भारी’ म्हणता म्हणता, ४०पेक्षा अधिक छोट्यामोठ्या पक्षांची NDAची मोट रचत, गुडघ्याला बाशिंग बांधून हे नुसते बसलेच नाहीत…तर, त्यानंतर, यांची एवढी खाली घसरण होत गेली की, भाजपाची गाडी (की, अंबानी-अदानीचा टेंपो?) थेट नवनीत राणा, कंगना राणावतपर्यंत येऊन थबकला…अरेरे, काय आणि किती रे, ही अवनती!

कंगना ‘राणावत’ म्हणजे काय, त्या ‘नर+इंद्रा’ला ‘ऐरावत’ वाटला की, काय? ती ‘राणावत’ काय आणि ही ‘राणा’ काय…दोघीही भाजपाई ‘शामभट्टाच्या तट्टाणी’च ना? एकीला २०१४मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचा झालेला साक्षात्कार; तर, दुसरीने मातोश्रीवर जाऊन ‘हनुमान चालिसा’ म्हणण्याची केलेली अपयशी नौटंकी!

‘राणावत आणि राणा’, या दोघींना आणि त्यांच्या बोलवित्या धन्यांना…४ जून रोजी, खऱ्याअर्थाने कळेल, जाज्वल्य-ज्वलंत ‘मराठी बाणा’!

स्वतःच्या ५६” छातीचा दावा करताय ना? विंध्याचल पर्वताच्या उत्तरेकडची वाराणसीची निवडणूक लढवताय ना; मग, खरे ५६” छातीचे असाल…तर, विंध्याचलाच्या दक्षिणेकडची एखादी निवडणूक लढवून दाखवा, राहुल गांधींसारखी!

लढवा, आंध्रप्रदेश, केरळ किंवा तामिळनाडूमधली…तुम्हाला हवी तिथली, कुठलीही. पण, तुम्ही ती राहुल गांधींसारखी कधिही लढणार नाही, लढू शकणार नाही. कारण, तुम्ही एक नंबरचे डरपोक आहात आणि जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष स्वतःला म्हणवणारा ‘भाजप’; हा फक्त, भारताच्या उत्तरेपुरता मर्यादित ‘विभागीय पक्ष’ आहे…नोटबंदी, इलेक्टोरल-बॉंड आणि PMCare फंडातल्या आणि आपल्या खासमखास दोस्त असलेल्या बड्या गुजराथी-भाषिक भांडवलदारवर्गाच्या काळ्या पैशावर बांधलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राजमहालाचा, ‘दक्षिणे’कडचा दरवाजा, कर्नाटक-विधानसभा निवडणुकीनंतर, तोंडावर आपटून केव्हाचाच बंद झालाय!

 

काश्मीरमधून ३७० कलम काढल्याचा प्रचार करत देशभर मतांची ‘भीक’ मागत फिरता (गेल्या १० वर्षांच्या कर्तबगारीचा, सगळा नन्नाचाच पाढा, असल्याकारणाने)…पण, काश्मीर खोर्‍यातील तीनही लोकसभा-निवडणुकीच्या मैदानातून (ज्या लोकसभेच्या जागा, ३७० कलम असतानाही, तुम्ही २०१९साली लढवल्या होत्या व सर्वच ठिकाणी दणदणीत पराभूत झाला होतात) पार्श्वभागाला पाय लावून पळ काढता आहात? कुठे गेला तुमचा तो भंपक ‘राष्ट्रवाद’ आणि ३७० कलम हटवल्यानंतर तुम्ही काश्मिरी-जनतेचा संपादन केलेला विश्वास??

…याविषयी, भाजपाचा ‘कुप्रसिद्ध’ अमित मालवीयकृत आयटी-सेल व मेंदूविक्या ‘गोदी-मिडीया’, तोंडात मूग गिळून गप्प का?

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (क्रमशः)