“इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३

देशाच्या लोकशाहीचा ‘DNA’ सुरक्षित राखण्याकामी ‘NDA’ला का गाडायचं आणि ‘INDIA-आघाडी’ला का निवडायचं… “इंडिया, एक आयडिया”, मालिकेतील लेख-अनुक्रमांक १३

———————————————————————

मा. उद्धवजींच्या शिवसेनेला आणि शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला, अगदी खालच्या पातळीवर जाऊन, ‘नकली’ म्हणून हिणवणाऱ्या…नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना, आता हे ठणकावून सांगण्याची वेळ आलीय की, शिवसेनेचं-राष्ट्रवादीचं नंतर पाहू…पण, ही जी तुमची बीजेपी आहे ना, तिच्याविषयी प्रथम बोलूया…जी, पूर्णतया ‘नकली’ बीजेपी आहे!

‘काँग्रेसमुक्त-भारत’ करता करता, काँग्रेससकट सगळे ‘विरोधीपक्षयुक्त-बीजेपी’ झालायत तुम्ही…विरोधी पक्षातले एकजात सगळे भ्रष्टाचारी नेते एकत्र करुन जमवलेली राजकीय-भट्टी, म्हणजेच तुमची ‘भ्रष्टाचारी जोडो पार्टी (B.J.P.)!

‘अगा जे कधि होणेची नाही’ असा, ४०० पारचा बोगस नारा देत व त्याद्वारे, देशाची राज्यघटना बदलण्याचा नापाक इरादा जाहीर करत आणि बेलगाम खाजगीकरण करत, तुम्ही आरक्षण संपवू पहाताय…पण, तुमचेच मुळचे; पण, आज तुमच्यामुळे विस्थापित झालेले भाजपावाले, बेंबीच्या देठापासून ओरडत…पक्षातील पदांच्या वाटपात, निवडणुकीतील तिकीट-वाटपात ‘आरक्षण’ मागतायत…सत्तेच्या धुंदीत, तुम्ही तिकडे दुर्लक्ष करताय, एवढंच!

…आमचे ‘बीजेपी’शी तीव्र स्वरुपाचे वैचारिक मतभेद होते, मतभेद रहातील; पण, अटलबिहारी बाजपेयींच्या नेतृत्त्वाखालची ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेली बीजेपी, हीच खरी ‘बीजेपी’ होती!

“माझं सरकार टिकवण्यासाठी एकाही खासदाराची मला भ्रष्ट मार्गाने मदत घ्यावी लागत असेल; तर, असली सत्तेची खुर्ची मी, एका क्षणात लाथाडून देईन”, ही बाजपेयींची भीमगर्जना होती आणि, यांचे बघा… निर्लज्जपणे देशभर, खोक्याबोक्यांचे काय काय काळे धंदे चाललेयत ते!

यासंदर्भात, हे सांगावचं लागेल की, वाल्याचा वाल्मिकी होण्याचे दिवस तेव्हाच संपले…जेव्हा, या भाजपाई-संघीय लोकांनी कुटुंबवत्सल, प्रेमळ, आरपार दयाळू असलेला सहिष्णू ‘राम’ (ज्याला, ‘जय सियाराम किंवा जय सीताराम’, हे मायेनं ओथंबलेलं पारंपारिक संबोधन होतं), साफ बाजुला सारुन…भुवया ताणलेला व हाती ‘रामबाण’ घेत धनुष्यावर प्रत्यंचा चढवणारा ‘रागीट-रौद्र’… तद्दन खोटा व सीतेशिवाय एकटादुकटा, असा ‘राम’ दाखवायला सुरुवात केली व त्याला साजेसं ‘जय श्रीराम’, हे नवं उग्र संबोधन दिलं!

लक्षात घ्या, यांच्या ‘प्रचारकां’ना कौटुंबिकप्रेमाचा ‘संसर्ग’ होऊ नये व ते सदैव एकटेपणातून खुनशी-क्रूर वृत्तीचे रहावेत, म्हणूनच त्यांना लग्न करण्यास बंदी असते किंवा केलेली लग्नं, ही लोकं मोडायला लावतात…सांगा, हे सगळे प्रघात, हे सगळं वर्णन; नेमकं कुणाच्या बाबतीत चपखल लागू पडतं?

तेव्हा, “वाल्याचा वाल्मिकी होण्याचे दिवस संपलेत आणि वाल्मिकीचा वाल्या होण्याचे दिवस अवतरलेत!”

त्यामुळे, “भ्रष्टाचारी तुरुंगातच जायला हवेत, अशी काही सध्या भारतात परिस्थिती नाही…ते मोदी-शहांच्या ‘नकली बीजेपी’त जाऊ शकतात आणि मौजमजेत जगू शकतात!”

पूर्वी पापी लोकं, त्यांच्या पापांचा हिशोब करुन चित्रगुप्ताकरवी, नरकात पाठवली जायची; पण, त्या चित्रगुप्ताला आणि त्या यमाला ‘इलेक्टोरल-बाॅण्ड’चे आणि अंबानी-अदानीसारख्या मोदी-मित्रांचे ‘खोके’ बीजेपीकडून पोहोचायला लागल्यापासून परिस्थिती बिघडलीय…ते ‘पापी’, आता मरणोत्तर नरकात जाण्याऐवजी जिवंतपणीच थेट ‘नकली बीजेपी’त जायला लागलेत. शिवाय, ‘यम आणि चित्रगुप्ता’शी बीजेपीने, ‘नकली-हिंदुत्वा’च्या माध्यमातून लावलेल्या ‘सेटिंग’मुळे, मेल्यावर त्यांना नरकातून सुटण्याची हमी देखील आहे!

हे सगळं जरी, असं अघटित असलं; तरी, आपण मात्र आपल्या हृदयीचा, आपल्या अंतःकरणीचा… न्यायी, सत्यवचनी, प्रेमळ असा खरा ‘राम’ स्मरायचा-जागवायचा आणि ‘जय श्रीराम’ असा उग्र नारा देत आलेल्या…साधूच्या नव्हे; चक्क रामाच्या वेषात आलेल्या अन्यायी, असत्यवचनी व क्रूर रावणांना अचूक ओळखायचं आणि लोकसभा-निवडणुकीच्या मतपेटीतून, त्यांच्यावर ‘रामबाण’ सोडून खरा ‘सर्जिकल-स्ट्राईक’ करायचा… धन्यवाद!

 …राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)  (क्रमशः)