आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, लढवू पणाला प्राण…
किसान-मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेऊन, पेटवतील सारे रान…
कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणाऱ्यांची, उडवू दाणादाण…
शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान…
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी, मांडणार हो ठाण…
… साने गुरुजी.
परमपूज्य साने गुरुजींच्या या क्रांतिकारी ओळी, गेल्या अनेक दशकांपासून मराठी मनं चेतवत आलेल्या आहेत. कोमल हृदयाच्या गुरुजींनी व्यक्त केलेल्या या आक्रमक भावना आजही तितक्याच प्रखर आहेत, हे सध्या दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन स्पष्ट झालेलेच आहे. “सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का?” असा इंग्रजी सत्तेला जळजळीत सवाल करणारे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळकांचे हे वाक्य आज इतक्या वर्षांनीदेखील विद्यमान मोदी सरकारला किती चपलख बसते, हेही इथे ओघाने आलेच. केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानसहित अवघ्या भारतवर्षातील शेतकऱ्यांनी दिल्ली गाठलीय. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत राजधानी गोठलेली असतानाही, बळीराजाच्या प्रक्षोभापुढे निसर्गही फिका पडावा, अशी परिस्थिती निर्माण झालीय. सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला… पाण्याचे फवारे, अश्रूधुर आणि लाठीहल्ला करीत सरकारने इंग्रजांच्या पावलावर पाऊल ठेवत, अमानुषपणे शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही, प्रखर निर्धाराच्या जोरावर शेतकरी मात्र, आजही आपल्या न्याय्य-हक्कासाठी ठाम आहेत.
मुळातच, देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मताचा आणि मनाचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, त्यांना न जुमानता मोदी सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे शेती-कराराच्या माध्यमातून, बडे भांडवलदार शेती व्यवसायात उतरतील व जमिनीच्या तुकड्यावर गुजराण करणाऱ्या बळीराजाला हद्दपार व्हावे लागेल, अशी शेतकऱ्यांची ठाम धारणा आहे आणि ती एकहजार टक्के खरीदेखील आहे. कोरडवाहू व आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे काही कवच आहे, ते गळून पडेल. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे साफ दुर्लक्ष करुन निव्वळ सत्तेच्या आणि संपत्तीच्या बळावर, फक्त धनदांडग्या-भांडवलदारी व्यवस्थेसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणे हे केवळ अमानुषच नव्हे, तर निषेधार्थ व घृणास्पद कृत्य आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून, शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असतानादेखील, त्यांच्याशी संवाद साधण्याचे साधे सौजन्यही मोदी सरकार दाखवत नाही, ही बाब संतापजनक आहे. अशा परिस्थितीत दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे ‘धर्मराज्य पक्षा’चे आद्यकर्तव्य आहे, असे आम्ही ठामपणे सांगतोय. “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका!” असा स्पष्ट आदेश आपल्या सैन्याला देणारा रयतेचा राजा शिवछत्रपती कुठे आणि त्याच शिवरायांच्या नावाचा वापर करुन कधीकाळी निवडणुकीत मतांची भीक मागणारा भाजप कुठे? शिवनीतीची तसूभरही चाड नसणाऱ्या अशा जुलुमी सत्तेचा निषेध करावा तेवढा थोडाच…!!!!
शेतीच्या शोषण-व्यवस्थेविरोधात आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून, ते क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरीणांनी याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढे दिलेत… आज दिल्लीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे अस्सल मराठी मातीतल्या ‘धर्मराज्य पक्षा’चे अशासाठी कर्तव्य आहे की, शेतकरी-कामगार आणि कष्टकरीवर्गासाठी आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करणारा, धनदांडग्या-भांडवलदारी व्यवस्थेविरुद्ध शड्डू ठोकून उभा राहणारा, कंत्राटी-व्यवस्थेला (Contract Labour System) प्राणांतिक विरोध करणारा आणि रक्तपिपासू-शोषक व्यवस्थेशी (Vampire State System) दोन हात करणारा, भारतातील पहिलावहिला पर्यावरणवादी पक्ष असलेला ‘धर्मराज्य पक्ष’च खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींची राजनीती व युगंधर श्रीकृष्णाच्या जीवनमानाचं तंतोतंत पालन करणारी राजकीय संघटना असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे !
जय हो !!
ना झुकने का शौक है,
ना झुकाने का शौक है,
कुछ एहसास दिल से जुड़े है,
बस उन्हें निभाने का शौक है…!!
जय महाराष्ट्र… जय हिंद…!!!
…राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)