“जागतिक तापमानवाढीचा आनुषंगिक परिणाम म्हणून गाढवं शहाणी व्हायला लागलीयत (पूर्वीसारखी माणसांची बिनतक्रार हुकूमत आता ती मानत नाहीत); तर, माणसं गाढवासारखी वागायलीयत अन् ‘जातधर्मविद्वेष, युद्धोन्माद, माणूस व निसर्गाचं टोकाचं शोषण’ यात अधिकाधिक गुंतू लागलीयत!” ….एका आंतरराष्ट्रीय मानसतज्ज्ञांच्या पथकाचा पहाणी अहवाल


वरील बातमीतले, आपले पूर्वज असलेले ‘माकड’, आपल्याला ‘शहाणपण’ शिकवू पहातेय की, “सरतेशेवटी, चलनी नोटा, या केवळ ‘कागदमात्र’ आहेत (हा ‘धडा’, एक ‘राजकीय गधडा’, वेगळ्या अर्थाने आपल्याला आठनऊ वर्षांपूर्वीच शिकवून गेलाय)…त्या खाऊन काही ‘उदरभरण’ होऊ शकत नाही!”

आधुनिक भांडवली अर्थव्यवस्था व जीवनशैलीजन्य कार्बन-ऊत्सर्जनातून उद्भवलेल्या जागतिक तापमानवाढीच्या महासंकटामुळे पुढील काही दशकातच, समस्त मनुष्यजातीला, वरील वैश्विक-सत्याचा प्रलयंकारी सामना करावा लागेल…तेव्हा, आपल्या अस्तित्वाचे पंख मिटले जात असताना मनुष्यमात्राला हे कळून चुकेल की, ना अन्न पिकवणारी सुपीक माती कुठल्या कारखान्यात तयार होत, ना जगण्यासाठी लागणारं अन्न कुठल्या कारखान्यात आपसूक तयार होत. घरात-बँकेत खच्चून भरलेल्या अब्जावधींच्या नोटा, जमीनजुमला-मालमत्ता, ब्लूचिप कंपन्यांचे शेअर्स, सोनंनाणं, हिरेमोती, अलंकार सगळं सगळं निसर्गाच्या रौद्रभीषण अवतारापुढे मातीमोल ठरणार आहे आणि ते आकळण्यास लावलेल्या अक्षम्य कालहरणाने, अवघ्या सजीवसृष्टीसह मनुष्यजातीचा अतिशय यातनामय असा करुण अंत घडून येईल…..

रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेनं (Vampire-State System) पिढ्यापिढ्यांचं निसर्गस्नेही उपजत शहाणपण असलेल्या “नराचा वानर” आणि “शहाण्याचा गाढव” बनवलेला असल्याने आणि ‘भांडवली-व्यवस्थे’चं मानवीसमूहाला अनावर असं आत्मघातकी ‘व्यसन’ जडलेलं असल्याने, वेळीच यातून कुणी बोध घेईल…ही शक्यता, केव्हाचीच संपुष्टात आलीय!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)