‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’च्या संपकरी कामगारांवर “औद्योगिक न्यायालया”चा आदेश पायदळी तुडवून तुर्भे(नवी मुंबई) पोलीसांची २८ नोव्हेंबर-२०१३च्या रात्री “सुपारीबाज” जबरदस्ती व लाठीमार!!!

पोलीस, विशेषतः नवी मुंबईतील पोलीस, हे राजरोस ‘खाकीवर्दीतले गुंड’ झालेले असून कंपन्यांच्या मालकांची बिनधास्त सुपारी घेऊ लागलेत; हा अनुभव, यापूर्वीही अनेक वेळा १) थॉमसन प्रेस २) एस्. पी. फॅब्रिकेटर्स ३) सिंडीकेट वायपर्स् ४) प्रगती इलेक्ट्रीकल्स् ५) प्रदीप मेटल्स सारख्या नवी मुंबईतील अनेक कंपन्यांच्या आंदोलनात आम्ही घेत आलेले आहोत. महाभारतातल्या दुर्योधन, दुःशासनाचे “बाप” बनलेले हे पोलीस, आपल्या “खिशात” ठेवलेल्या कायदा व यंत्रणेचा सोयिस्कर अर्थ लावत “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”… हे ब्रीद बाजूला ठेऊन “खलरक्षणाय सद्निग्रहणाय” असं ‘खलनायकी’ वर्तन उघड उघड करू धजावायला लागलेतं,… हे सामान्य जनतेच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. भ्रष्ट राजकारणी आणि त्यांनी पोसलेले गुंड… यांच्यासमोर, ‘पिवळी’ होणारी ही ‘खाकीवर्दीतली’ अवलाद, आमचा ‘कायद्याच्या आधारे जगण्यावरचा’ विश्वासच जागोजागी उधळून लावायला लागलीयं! कसली घटना… आणि कसले कायदे???

कधि आणि कुठलं आमचं आंदोलन कायद्याबाह्य पध्दतीनं आम्ही केलयं… ते एकदा, या दलातल्या ‘सुपारीबाज’ अधिकाऱ्यांनी जाहीररित्या सांगाव… आमचं आव्हान आहे त्यांना, हे त्यांनी सिध्द करूनचं दाखवावं! मुळात, ‘कामगारकायदे’ हे ‘मालक-कायदे’… ‘कामगारन्यायालयं’ ही ‘मालकन्यायालयं’… आणि, ‘कामगारमंत्री’ हा ‘मालकमंत्री’ असतानाही, आम्ही “षंढ नवरा कुंकवाला आधार” समजत, … आहेत त्या कायद्यांनिशी… आहे त्या स्थितीत लढतोयं! आता तर, ही सगळी व्यवस्था ‘नेसूचं सोडून डोक्याला गुंडाळून’ निरर्गल पध्दतीनं वागायला सरावलीयं!

पोलीसांचे कामगारांवरचे लाठीमार पॉलीमरप्लॅस्टिकच्या नव्या लाठ्यांनिशी (ज्या रात्री कॅमेऱ्यात दिसू शकत नाहीत!) रात्रीच कसे होतात? थॉमसन प्रेस(२६ जून२०१०) व यश प्लास्टोमेट(१८ जानेवारी२०१०) येथेही रात्रीचीच वेळ साधून पोलीसांनी कामगारांवर कायदा मोडून केलेल्या लाठीमाराचे वळ अजूनही कामगारांच्या पाठीवर नसले, तरी मनात ताजे आहेत. तुर्भे पोलीसांनी मालकांची सुपारी घेऊन कामगारांना लाठीमार करत हुसकावताना, त्यांचा कॅमेरासुध्दा फोडून टाकण्याची दक्षता घेतली… वाह! खाकीवर्दीवाल्यांनो वाह!!!

राजकारण्यांना आणि बड्या पोलीस अधिकाऱ्यांना ‘पैसे चारून’ पोलीस दलात नोकऱ्या मिळवायच्या आणि निवृत्त होईस्तोवर ‘चोऱ्या करत’ खुर्च्या उबवायच्या… हे, भ्रष्ट व अनीतिमान पोलीसांचे धंदे कसे आणि कधि बंद होणार? प्रामाणिक पोलीसकर्मचारी अजिबात पोलीसदलात नाहीत, असं आमचं म्हणणं नाही; पण, त्यांची संख्या झपाटयानं रोडावत चाललीयं आणि त्यांचा आवाज नुसता क्षीण झालायं असचं नव्हे… तर, तो गल्लोगल्लीपावलोपावली राजरोस दाबला जातोयं! हे सगळं, फारच चिंताजनक होत चाललयं आणि सहनशक्तिच्या पलिकडे जात चाललयं. या पोलीस अधिकाऱ्यांना आणि पोलीसांच्या खाकीवर्दी आड दडणाऱ्या “शिखंडी” राजकारण्यांना, आमचं खुलं आव्हान आहे की, त्यांनी एकदा जाहीरचं करावं की, भ्रष्टाचार, शोषण व अन्यायाविरूध्द तहहयात झगडणाऱ्या अन्यायग्रस्त व शोषितांसाठी केवळ आणि केवळ “नक्षलवादी” बनणं… हाच एकमेव, ‘अंतिम पर्याय’ आहे… “आखरी रास्ता” आहे!… म्हणजेच एकदाचा, आमच्यासारख्या कायद्याची बूज राखू पाहणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कायदेशीर व न्यायालयीन लढे, यापुढे त्यांनी लढत बसायचं किंवा कसं… याचा, त्यांना तार्किक निर्णय घेता येईल!

छद्मीपणे हसत हसत… न्यायालयांचे, आम्ही कष्टाने मिळवलेले आदेश बासनात बांधत, ‘स्थानिक व संस्थानिक’ राजकारण्यांच्या इशाऱ्यांने मालकांचे, पोलीसांनी दलाल बनणं व त्यांच्या हितसंबंधांचं कायदा उल्लंघून रक्षण करणं… हा कामगारआंदोलनांमधला हल्ली रिवाज झालायं! रोह्यात ‘निरलॉन’ कंपनीच्या लढयात तेच… ठाण्यात(शहापूरआसनगांव) ‘यश प्लास्टोमेट”च्या आंदोलनात तेच… तळोजा (रायगड)च्या ‘पिडीलाईट इंडस्ट्रिज’मध्ये तेच… सगळीकडे एक आणि एकच चित्र… फक्त, तपशीलात किरकोळ फरक!

चार दिवसांपूर्वी, २४ नोव्हेंबर२०१३ रोजी त्या ‘लक्ष्मी इंटरप्रायझेस’ कंपनीच्या नव्या व्यवस्थापकानं(सनदशीर आंदोलन मोडून काढण्याच्या कामासाठी खास नियुक्त केलेल्या!) मालकाच्या मुलाला हाताशी धरून ‘कंपनीच्या गेटवर नव्हे’, तर गेटपासून ५० मीटर दूर (हे असले दळभद्री न्यायालयीन आदेशही आम्हाला नाईलाजाने पाळावे लागतात!) शांतपणे बसलेल्या कामगारांवर रात्री गुंडांकडून जोरदार दगडफेक करवली. कामगारांची डोकी फुटली… तर, त्याची धड रितसर तक्रार नोंदवून घ्यायलाही पोलीस तयार नाहीत(कारण, हे सगळं त्यांच्या संगनमताखेरीज होऊच शकत नाही!). त्यानंतरचा हा, पोलीसांनी जबरदस्तीनं कामगारांकडून तपासणी ‘न’ करवून घेता (संपकरी कामगारांकडून बाहेर जाणाऱ्या मालाची शहानिशा ‘न’ करताच, औद्योगिक न्यायालयाचा आदेश डावलून!) वाटेल ते कंटेनरमध्ये पॅकिंग करून (उदा. बेकायदेशीररित्या यंत्रसामुग्री, कच्चामाल, अर्धकच्चामाल इ.) पाठवण्याचा हा ताजा घटनाक्रम!

याचा अर्थ… सन्मानानं जगण्यासाठी, पोटासाठी, अन्यायाविरूध्द कोणी सनदशीर मार्गानेही लढण्याची हिंमत करायची नाही… तसा कुठलाही मार्गच आम्ही शिल्लक ठेवलेला नाही, …अशा या “लुटारू-व्यवस्थे”चा हा इशारा आम्ही समजायचा? हे हरामजादे राजकारणी, मालकवर्ग आणि शासकीय पोलीस अधिकारी स्वतःला समजतात तरी कोण… याचा, आता महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेनं गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊन ठेपलीयं. तरी देखील, अजूनही आम्ही शहामृगासारखे, बाहेर विध्वंसकारी वादळ घोंघावत असतानाही, वाळूत चोच खुपसून बसणार असू; तर, फक्त परमेश्वरचं आपलं आणि या आपल्या महाराष्ट्राचं रक्षण करो… कल्याणाची बाब तर दूरच राह्यली!!!

…राजन राजे(अध्यक्ष-धर्मराज्य पक्ष)