“लालकृष्ण अडवाणींना ‘गहना कर्मणो गतिः’, या श्रीकृष्णाच्या गीतेतल्या कर्मसिद्धांताचा जळजळीत प्रत्यय, अयोध्येतल्या राममंदिराच्या उद्घाटनानिमित्त चांगलाच आला असेल…!!!”

अडवाणी, विनय कटियार, उमा भारती…ज्यांनी ज्यांनी म्हणून, ‘मंदिर वहीं बनायेंगे’ म्हणत दीर्घकालीन आंदोलन केलं, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगले…त्यापैकी बहुतेक कुणालाही निमंत्रण नसावं? अडवाणींना तर, अगोदर निमंत्रण देत, नंतर प्रकृति-अस्वास्थ्याचं कारण जबरदस्तीने द्यायला लावून निमंत्रण अचानक रद्द करण्यात आलं. नितीन गडकरी, राजनाथसिंह यांची अवस्था तर उद्घाटन-समारंभात, “हरवले आहेत, कुणाला सापडले तर कळवा”, अशी केविलवाणी झालेली! उ. प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी {तीन ‘A’ (अमिताभ, अंबानी, अदानी) कॅमेर्‍यात मोदींच्या खालोखाल सतत टिपले जात असताना…आदित्यनाथ योगी, फोटोत फारसे दाखवलेच गेले नाहीत} वगळता, एकाही मुख्यमंत्र्याला (मोदींना ‘महाशक्ति’ असं संबोधणार्‍या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचीही पत्रास ठेवली गेली नाही) साधं बोलावणं देखील नाही… हे सगळे, एवढ्या मोठ्या अपमानाचं ‘हलाहल’, ही लोकं पचवूच कसे शकतात, हे एक मोठं कोडंच आहे! राजकारणात, लोकं एवढी कोडगी होऊ शकतात…गेंड्याच्या कातडीलाही लाजविण्याइतपत?

अयोध्येतल्या राममंदिराचं उद्घाटन (अयोध्येत अनेक राममंदिरं आहेत आणि त्या प्रत्येक मंदिरातले विश्वस्त व पुजारी…रामाचा इथेच जन्म झाला, असं ठासून प्रतिपादन करत असतात, ते वेगळंच), ‘वन अँड ओनली वन, नरेंद्र मोदी शो’ होता तो…गर्भगृहाच्या पावित्र्याची ऐशीतैशी करणारे कॅमेरे, थेट गर्भगृहात नेले जावेत? घडलंय असं कुठल्या देवस्थानात??

**…आणि, सगळ्यात महत्त्वाची बाब ही की, सगळ्या अयोध्येचं पारंपरिक पवित्र-स्वरुप लवकरच साफ नष्ट होईल आणि काँक्रिटच्या व्यावसायिक टोलेजंग वास्तूंमधून पैशाचा धूर निघताना दिसेल…जी, महाराष्ट्रातल्या शिर्डीची अवस्था झालीय; त्याहीपेक्षा वाईट अवस्था, भविष्यात शरयूतीरावरल्या अयोध्या-नगरीची झाली, तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. ‘अयोध्या-नगरी’, झपाट्याने ‘धंदेवाईक-नगरी’ बनत जाणार आहे; कारण, तसं अगदी सोप्पं आहे, “अयोध्येतल्या जमिनी, नकद दाम मोजून तमाम धनदांडग्या-मुजोर गुजराथ्यांनी अगोदरच खरेदी केलेल्या आहेत. राममंदिरातले आणि मंदिराभोवतीचे अनेक महत्त्वाचे व मलईदार ठेकेही, गुजराथ्यांनीच बळकावले असल्याचं समजतं!

राम आणि दामयाचा, भाजपातल्याधंदेवाईक धार्मिक लोकांसाठी, जो फारच घनिष्ट संबंध असतो, तो असा!

…म्हणजे, भावनिक-लाटेवर स्वार होणारी भोळसट मतंही निवडणुकीत मिळत रहाणार आणि करोडो भाविकांच्या येण्यामुळे प्रतिदिनी करोडोंचा धंदा होत रहाणार… राम के नामआम के आम और गुठली के दाम“!!!

११ दिवसांच्या अनुष्ठानानंतर, रामाच्या मूर्तिच्या पूजा व प्रतिष्ठापनेनंतर तासाभरातच, “कुछ लोग कहते थे, राममंदिर बन जायेगा, तो आग लग जायेगी”, हे उद्गार नेमकं काय दर्शवतात…अंतःकरणातला राम की, रावण?

तुम्हाला पं. नरेंद्र मोदींची तुलना, भगवान विष्णूशी करायचीय की, राजा विक्रमादित्याशी…ते तुमचं तुम्ही ठरवा, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करु शकतो (कारण, तुम्हा ‘स्वयंघोषित’ हिंदुत्ववाद्यांना कोण अडवणार?); पण, जर त्यांची तुलनाश्रीमान योगीम्हणत, शिवछत्रपतींशी कुणी करु धजावेल; तर हा उभा महाराष्ट्र, ते कदापि सहन करणार नाही, भाजपाला कधिही माफ करणार नाही तो, जो कुणी श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्राचा कोषाध्यक्ष वगैरे असलेला स्वामी गोविंद देव गिरी महाराज, वरील वाक्ताडन करुन गेलाय…त्याचा ‘धर्मराज्य पक्षा’तर्फे आम्ही तीव्र निषेध, तीव्र धि:क्कार करीत आहोत!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)