स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरावर काय न्यायालयीन कारवाई करायची असेल ती करा…पण, कायदा हातात घेणाऱ्यांचे हात कायद्यानेच ‘कलम’ लावून ‘कलम’ करा….

कुणाल कामरा यांच्या कार्यालयाच्या तोडफोड-प्रकरणी “तोडलं त्याचं समर्थन करत नाही”, असं मंत्री उदय सामंतांचं म्हणणं असेल; तर, त्या संबंधितांना तत्काळ नुकसानभरपाई कधि दिली जाणार? नागपूर-दंगल प्रकरणी विद्युतवेगाने नुकसानभरपाईची कारवाई करु पहाणारे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याप्रकरणी, नुकसानभरपाई देण्याची कधि तत्परता दाखवणार की, नेहमीप्रमाणेच अशा ठिकाणी कच खाणार? निलेश राणे, भरत गोगावले जर टीव्हीवर येऊन उघडपणे हिंसाचाराचं समर्थन करणार असतील…तर, त्यांच्यावरही मुख्यमंत्री कायदेशीर कारवाई कधि करणार की, तेवढी राजकीय-हिंमत त्यांच्यात नाही??
म. गांधी, पं. जवाहरलाल नेहरु यांच्यापासून ते राहुल गांधी, सोनिया गांधींपर्यंत सर्वांवर…अश्लाघ्य, अर्वाच्च भाषा वापरणाऱ्या व अत्यंत खालच्या पातळीवर (ती ही धादांत असत्य व रचलेल्या बनावट कथानकांवर आधारित) टीका करत ‘कमरेखाली वार’ करणार्‍या भाजपाचे व त्यांच्या मातृसंघटनेचे म्होरके मु. देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी आजची टीव्हीवरची भाषा शोभते तरी? तुमच्यावर टीका झाली की, एवढ्या मिरच्या झोंबाव्यात, देवेंद्रजी? देवेंद्रजी, तुम्ही भस्मासुरांच्या मस्तकी आज हात धरलेला आहे; उद्या तो तुमच्या माथी ठेवला जाणार आहे…नव्हे, तसा तो ठेवला जावाच, हीच ईशरचरणी आमची प्रार्थना आहे. गीता तुम्ही नीट वाचली असेल तर, देवेंद्रजी, नियती कोणाला सोडत नसते, हे विसरु नका!
“आम्ही काय वाटेल ते बरळू, वाटेल ते करु…कोण अडवणार आम्हाला”…ही जर भाजप, शिंदेसेनेच्या गुंडसेनेला मस्ती आली असेल…तर, ती मस्ती उतरविण्याची ताकद, ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची पावन-पवित्र भूमी बाळगून आहेच…अरे, तुम्ही करुन करुन तिला किती अपवित्र कराल? शिवछत्रपतींची काय किंवा म. गांधी, पं. नेहरुंची काय…या सगळ्यांची पुण्याई कळीकाळाला पुरुन उरणारी आहे.
तुम्हा लोकांचा वारसा, हा कधिच शिवछत्रपतींचा नव्हता…तो नेमका कुणाचा, ते तुम्हीच वरचेवर सिद्ध करत असता आणि त्याचीच ‘कबर’ खोदण्याची भाषा करता? आताही, तेच केलंयत तुम्ही!
शिवछत्रपतींचा व छ. संभाजी महाराजांचा घनघोर अवमान-अपमान करणाऱ्या काळी टोपीछाप राज्यपाल कोश्यारीपासून कोरटकरपर्यंत…कुणाच्याच विरोधात या गुंडपुंडांचं रक्त कसं कधि खवळलं नाही?
“सापाच्या शेपटीवर पाय देऊ नका” म्हणणारे ठाण्याचे बिनकण्याचे खासदार नरेश म्हस्के, स्वतःला व आपल्या संघटनेला, स्वतःच ‘साप’ म्हणून संबोधतायत…हे देखील भान गुंडगिरीचं समर्थन करताना, या महाभागांना राहीलेलं नाही… धि:क्कार असो, धिःक्कार असो!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)