आमदार काॅ. लहानू कोम….

(मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नव्वदीतले माजी आमदार/खासदार काॅ. लहानू कोम यांची, शब्दात लहान पण संदेशात महान असलेली, एक आठवण सांगताहेत…एक अत्यंत संवेदनशील लेखक, परीक्षक व साहित्य क्षेत्रातील दिग्गज सर्वश्री सुनिलजी कर्णिकसाहेब…लहानू कोम यांच्यासारखी जातिवंत समाजवादी-साम्यवादी मंडळी, आता विधिमंडळ सभागृहात महाराष्ट्राची जनता निवडून पाठवत नाही, हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे…ही मंडळी, विधिमंडळ-सभागृहाबाहेरच कुठेतरी आदिवासी भागात, अन्य ग्रामीण श्रमिकवर्गात अन्यथा कुठेतरी शहरीभागात…’आऊटसोर्सिग व कंत्राटी-कामगार’ पद्धतीचा ‘भांडवली-हल्लाबोल’ झाल्याने विकलांग बनलेली कुठलीशी युनियन जेमतेम चालवताना दिसतात…आणि, मराठी जनता सुजाण बनून कधि आपल्याला राजकारणात संधि देते; याची चातकासारखी वाट पहात सभागृहाबाहेर दीर्घकाळ तिष्ठत उभे रहातात…शेवटचे गणपतराव देशमुखसुद्धा आता सभागृहात अपवाद म्हणून राहिलेले नाहीत आणि म्हणूनच, महाराष्ट्राच्या विधिमंडळातल्या महिला-आमदारांची भाषादेखील टपोरी, अश्लाघ्य झालीय…महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती अत्यंत गंभीर व स्फोटक बनत चाललीय! लहानू कोम, गणपतराव देशमुखांची सुसंस्कृत परंपरा खंडित झाल्यानं, विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर गुन्हेगार लोकप्रतिनिधींची एकच वावटळ सध्या महाराष्ट्रात उठलीय. राजकीय क्षेत्रात मोठा दबदबा असलेला गुन्हेगारांचा ‘बादशहा’, ज्याला हल्लीच्या परिभाषेत ‘आका’ म्हणतात; तो फक्त बीडमध्येच नसतो; तर, प्रत्येक जिल्हाच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी, त्याचा नरभक्षी बिबळ्यासारखा दक्षिणेतल्या कोकणापासून उत्तरेतल्या ठाण्यापर्यंत महाराष्ट्रभरात सर्वत्र मुक्त वावर असतो. एखादी अंजली दमानिया नेट लावून धरते म्हणून ‘बीड’ हे, गुन्हेगारांचं ‘अभयारण्य’ म्हणून आपल्याला परिचित तरी होतं; पण, जरा नीट तपासून पाहिलं तर, संपूर्ण महाराष्ट्रच गुन्हेगारांचं ‘निबीड अरण्य’ आहे, हे आपल्या ध्यानात आल्यावाचून रहाणार नाही!
हा आमच्या ‘शिवबा’चा महाराष्ट्र नाही…संतांचा तर नाहीच नाही. आजचा महाराष्ट्र, हा क्रूरकर्मा औरंगजेबाचा आहे. सखेद आश्चर्य म्हणजे, व्यवहारतः ‘औरंगजेब’ असलेलेच शिरा ताणून ताणून रोज टीव्हीवर येऊन औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची अत्यंत निरर्गल ‘राजकीय-नौटंकी’ करत असतात…सांगा, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा? आता, दोनशे-चारशे गुंडांच्या सशस्त्र टोळ्या उजळमाथ्याने बाळगणारे आणि म्हणूनच, कुणालाही उचलून नेऊन नाहीसं करण्याची सैतानी-क्षमता असणारे राजकीय-पुढारी नावाचे ‘पेंढारी’…नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्रीच नव्हे; तर, थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री होताना पहाण्याचं दुर्भाग्य महाराष्ट्राच्या लाल-काळ्या मातीच्या ललाटी लिहीलं जातंय…कधिकाळी शिवबा-संतांच्या महन्मंगल मराठी-संस्कृतीशी नातं सांगणारी ही महाराष्ट्राची लालकाळी माती; आता कूस बदलून गुंडपुंड, खंडणीखोर खुन्यांशी सोयरिक जमवून बसलीय…राजकीय कूस बदललेल्या त्या मराठीमातीला, खांद्यावर क्रूस घेतलेला येशू नकोय; हाती नंग्या तलवारी, चाॅपर, कोयते घेतलेले गँगस्टर हवेत…जणू तिला प्रेमाऐवजी रक्ताची तहान लागलीय.
काॅ. लहानू कोम, काॅ. गणपतराव, काॅ. कृष्णा खोपकर, काॅ. कृष्णराव धुळप, काॅ. गोदुताई परुळेकर यांनी महाराष्ट्रात सकस राजकीय-संस्कृती रुजवली, वाढवली…तर नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, रामदास कदम, प्रताप सरनाईक यांनी ती साफ सडवली, बिघडवली!
एखादा न्यूझीलंडचा किंवा नाॅर्वेसारख्या स्कँडेनेव्हियन देशाचा पंतप्रधान पदावरुन पायउतार होताच सायकलीने वा बसने कसा फिरतो, याचं रसभरित कथावर्णन केलं जातं; पण, आपल्याच महाराष्ट्राच्या मातीत उगवून कातरवेळेकडे झुकलेल्या वा गाडल्या गेलेल्या लहानू कोम, गणपतरावांसारख्या संजीवक जडीबूटीकडे आपलं लक्ष वेधलं जात नाही…सुनिलजी मात्र, खालील छोटेखानी किस्सा सांगत, बोट धरुन आपल्याला त्या विस्मृतीत गेलेल्या अभिमानास्पद घटनाक्रमाकडे खेचून नेतायत, हे निःसंशय स्पृहणीय होय…धन्यवाद!

….राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)


आ म दा र काॅ. ल हा नू को म….

1975 सालच्या सुमारास आम्ही ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी तालुक्यांमधे फिरत असू. अरुण प्रधान, अनिल शाळिग्राम, रवी जोशी, अनिल क्षीरसागर, अशोक परांजपे, असे मित्र सोबत असत. एकदा तलासरी तालुक्यात गेलेलो असताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आमदार लहानू कोम यांच्या घरी जाऊन मुलाखत घेतलेली आठवते.

साधीशी पण स्वच्छ झोपडी, मंद प्रकाश, शेणाने सुरेख सारवलेली जमीन, एका साध्याशा खुर्चीवर बसलेले पंचविशीतले विनम्र आमदार, अंगावर पांढरा हाफशर्ट आणि खाकी हाफपॅन्ट, लहानखुरा देह, असं स्मृतिचित्र अंधूक आठवतं.

“तुम्हाला आमदार म्हणून जे मानधन मिळतं, ते तुम्ही कसं खर्च करता ?” असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. यावर “आम्ही ते पक्षाकडे जमा करतो. त्यातले थोडे पैसे पक्ष आम्हाला खर्चासाठी देतो”, असं उत्तर त्यांनी दिलं होतं. ‘ठाणे वार्षिक’ नावाच्या आमच्या दिवाळी अंकात ही मुलाखत प्रसिद्ध झालली असावी. त्या काळात तलासरीमधे रात्रीच्या अंधारात ओबडधोबड रस्त्यावरून चालताना, ओंजळीत चमचमणारे काजवे घेऊन वाट शोधणारे गरीब आदिवासी बांधव आठवतात…

यानंतर पन्नास वर्षं गेली. अलिकडे दोनचार वर्षांपूर्वी मी प्रा. रमेश पानसे सरांच्या आदिवासी आश्रमशाळेत पालघरला गेलो असताना, त्यांचे जवळचे सहकारी श्यामदादा यांच्याकडे लहानू कोम यांची चौकशी केली. “ते आता active नाहीत” एवढंच त्रोटक उत्तर मिळालं. तिथल्या नव्या पुलाला ‘काॅ. गोदुताई परुळेकर उड्डाणपूल’ नाव दिलेलं दिसलं.

दोन दिवसांनी संध्याकाळच्या सुमाराला आम्ही रिक्षातून जात असताना अचानक श्यामदादा म्हणाले, “ते बघा लहानू कोम !” मी बाहेर पाहिलं…अंधारात एक साधीशी, लहानखुर व्यक्ती एकटीच रस्त्याच्या कडेने चालली होती. माझे डोळे निष्कारण भरुन आले…

…सुनिल कर्णिक (99300 19060)