ईव्हीएम हेराफेरी /निवडणूकपूर्व व निवडणूकपश्चात फसवणुकीचा खास भाजपाई गोरखधंदा /इलेक्टोरल-बाॅण्ड, नोटबंदी वगैरे घोटाळ्यांतील काळा-पैसा आणि पराकोटीची राजकीय-नीतिमत्ताशून्यता… या व अशा लोकशाहीविरोधी बाबींच्या बळावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बळकाविणारे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत, “महापुरुषांचा अवमान करणार्यांना टकमक टोकावरुन ढकललं पाहिजे!”
* …तेव्हा, त्याकामी सर्वप्रथम, *”शिवछत्रपतींचा अगदी ठरवून जाणिवपूर्वक घोर अवमान करणार्या, ‘काळीटोपी छाप’ माजी राज्यपाल ‘भगवा सिंग’ कोश्यारी (क्रांतिकारक ‘भगतसिंगां’चं नाव घेऊन अवमान का करावा हो?)… ज्यांची, सर्वोच्च न्यायालयाने घटनाविरोधी बेकायदेशीर कारभार करणारे राज्यपाल, अशी संभावना केली होती, त्यांचा नंबर लावावा”, अशी तमाम जागृत महाराष्ट्रीय शिवप्रेमींची जनभावना असणारच किंवा असलीच पाहिजे (अन्यथा, तशी भावना नसणारा, फक्त शिव जयंती-पुण्यतिथी साजरी करणारा ‘नौटंकीबाज’ ठरेल),…त्या जनभावनेचा त्यांनी आदर राखावा!
* विशेष बाब म्हणजे, त्याच किल्ले रायगड स्मारक मंडळाच्या ३४५ व्या शिव पुण्यतिथी सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणाऱ्या केंद्रिय गृहमंत्री अमित(भाई) शाह यांनी “ये क्या आंबेडकर, आंबेडकर लगा रखा है, ये तो आजकल आंबेडकर का बार बार नाम लेने की एक ‘फॅशन’ ही हो गई है” असा महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा उघड उघड अपमान केला होता… हे दांडगी स्मरणशक्ति असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना चांगलंच स्मरत असेल. अशा ‘अपराधी’ केंद्रिय गृहमंत्र्यांबाबत नेमकी कुठली भूमिका आपले मुख्यमंत्री घेणार आहेत, ते ही समस्त मराठी जनतेला उद्याच्या आंबेडकर-जयंतीच्या निमित्ताने एकदाचं कळू दे…त्यांना मुख्यमंत्री ‘टकमक’ टोक दाखवणार की, बदलापुरच्या अक्षय शिंदे प्रकरणासारखी बनावट पोलिस ‘चकमक’ घडवणार?
* तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या खा. उदयनराजे भोसले यांनी सदरहू कार्यक्रमाचं ‘पुढारपण’ केलं, त्या उदयनराजे-महाराजे यांना आता, कंत्राटी-कामगार पध्दतीतील गुलामगिरी व नवअस्पृश्यतेत खितपत पडलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या तरुणाईने, अत्यंत कडक शब्दात जाब विचारला पाहिजे की, “तेरावे वंशज म्हणून ते शिवछत्रपतींच्या विचारधारेचा व राजनितीचा ‘वारसा’ चालवतायत की, त्या वारसा-विचाराचं ‘तेरावं’ घालतायत?”
…कारण, “शिवछत्रपतींनी ‘वतने’ खालसा केली”… म्हणजे, “आजच्या परिस्थितीत बोलायचं तर, मूठभर प्रस्थापित धनदांडग्यांचं समाजावरील अन्यायी वर्चस्व नष्ट केलं व ‘आर्थिक-विषमता’ खूप कमी केली” आणि “शिवछत्रपतींनी ‘कुळांना’ स्थिरता दिली”… म्हणजे, “आजच्या परिभाषेत, कंत्राटी-कामगारांना नोकरीत ‘कायम’ केलं”… तेव्हा, ‘शिववंशज’ या नात्याने व खासदार या जबाबदारीने उदयनराजे, हे पश्चिम महाराष्ट्रातली (महाराष्ट्रातली बात सोडाच) किंवा किमानपक्षी त्यांच्या मतदारसंघातली तरी, “शिवछत्रपतींच्या नितीनुसार ‘कंत्राटी-गुलामगिरी’ प्रयत्नपूर्वक नष्ट करु पहातायत की, ‘मसलमॅन’ म्हणून (‘मुसलमान’ नव्हे हो…कारण, भाजपवासी झाल्यापासून त्या शब्दाची त्यांना फारच ‘ॲलर्जी’ झालीय ना) आपल्या प्रभावक्षेत्रात, ‘शिवनिती’ला बेधडक धाब्यावर बसवून मराठी-रयतेचं रक्त-घाम भांडवलदारवर्गाला अत्यंत स्वस्तात विकण्याची ‘कंत्राटं-ठेके’ स्वतःच घेऊ पहातायत किंवा त्यांचे बगलबच्चे घेतायत”, याचा त्यांनी जाहीर खुलासा करण्याची हिंमत दाखवावीच!
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||
(संयुक्त-महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’… राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…शिवछत्रपतीराष्ट्र!)
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)
(“मराठी-तरुणाईला ‘कंत्राटी’ फडतूस नोकऱ्यांची भीक नको…नोकऱ्यांमध्ये ‘सन्मान-सुरक्षितता’, उत्तम ‘वेतन’ व नफ्यातील हक्काचा वाटा म्हणून भरभक्कम ‘बोनस’ हवा”…या धर्मराज्य पक्षप्रणित ‘श्रमिकांचा महाराष्ट्र अभियानां’तर्गत प्रसारित संदेश)