“प्रथम नोटबंदी, मग ३७० कलम रद्द”…असे एकेक तथाकथित ‘जहाल’ उपाय योजून, दहशतवाद संपवल्याचे डांगोरे पिटणारे राजकीय-विदूषक, सध्या कुठे लपलेत…???
गेल्या दहाबारा वर्षात शेकडो लोकं दहशतवाद्यांकडून मारली जात असतानाही; गोदी-मिडीयाकडून नेहमीप्रमाणेच बातम्या दाबल्या गेल्यामुळे, पर्यटक या विदुषकांच्या ‘बोलबचनगिरी’वर ‘अंधविश्वास’ ठेवत…मोठ्या संख्येने काश्मिरात जाऊ लागले आणि तिथेच घात झाला! टाळ्या आणि थाळ्या वाजवून ‘करोना’ला ‘गो बॅक’ करण्याच्या दर्जाचाच, हा ‘अंधविश्वास’ होता.
…त्यातून, आलेला गाफिलपणा व सुरक्षेतली अक्षम्य शिथिलता-ढिलाई, डझनावरी पर्यटकांचे निष्कारण प्राण घेऊन गेली. एकीकडे तुटपुंज्या पगाराचे ‘अग्निवीर-गुलाम’ म्हणून अर्धप्रशिक्षित नवतरुण भरती करायचे आणि निवृत्त लष्करी अधिकारी जी. डी. बक्षी म्हणाले त्याप्रमाणे, १ लाख ८० हजार कायम जवान भरतीच करायचे नाहीत…परिणामतः, दोन हजाराहून अधिक पर्यटक असलेल्या ठिकाणी सुरक्षा-व्यवस्थाच मौजूद नव्हती; दुसर्या बाजुला, भाजपच्या आलतूफालतू नेत्यांच्या दिमतीला मात्र कायमच कडेकोट बंदोबस्त!
…सुरक्षेतील या शिथिलता-ढिलाईच्या जोडीला ‘पुलवामा’च्या वेळेप्रमाणेच, याहीवेळेस ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ देशाच्या वायव्य सीमेवर टांगलं गेलं! तथाकथित भारतीय ‘जेम्स बाँड, शेरलाॅक होम्स’ पुन्हा एकवार कचकड्याचे बाहुले ठरले आणि हॅरी पॉटरच्या पुस्तकातली जादू शिकलेले पाकिस्तानी दहशतवादी, त्यांच्या डोळ्यादेखत आपला कार्यभाग साधून गेले…जगभर आपली छी: थू चाललीय, ती त्यामुळेच.
पठाणकोट, पुरी, पुलवामा आणि आता पेहेलगाम…अशी या ‘पादरटां’ची ‘प’ ची लाजिरवाणी ‘बाराखडी’ अशीच न थांबता-थबकता सुरुच आहे. पठाणकोट हल्ल्यापासूनच सिंधूनदी-करार मोडण्याची (सध्या तो फक्त, ‘निलंबित’च ठेवलाय) व त्याद्वारे पाकिस्तानची कंबर मोडण्याची धमाकेदार पोकळ धमकीची भाषा, मागील पानावरुन पुढे चालूच आहे (पुरीच्या दहशतवादी हल्ल्याप्रसंगी तर, हीच धमकीची भाषा वापरणाऱ्या बड्या भाजपाई नेत्याने शब्द फिरवून सारवासारव केलेली, स्मरत असेलच वाचकांना)…ना हे धड ‘लाल चीन’ला ‘लाल डोळे’ करुन दाखवणार (चीनने गलवान खोर्यातील आपला ४००० चौ. कि. मी. एवढा मोठा भूभाग बळकवलाय तरीही), ना पाकिस्तानला कायमचा धडा शिकवणार…मात्र, १९४८चा पाकिस्तानी हल्ला व १९६२चं चीनचं आक्रमण; यावरुन, कायमच पं. जवाहरलाल नेहरुंच्या नावाने मोठ्याने गळे काढून रडणार, आरडणार…वरुन निर्लज्जपणे बिहारच्या निवडणूक प्रचार सभेत हास्यविनोद करत रमणार! अवघा देश शोकसागरात बुडालेला असताना, भारतीय जनतेच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे, हे कसले बेशरम चाळे चाललेत?
…लक्षात घ्या, आमचे छत्रपती शिवाजी महाराज, उण्यापुऱ्या पन्नासएक वर्षांच्या उभ्या हयातीत कधिच गाफिल राहिले नव्हते…कायम गाफिल राहिले, ते मोंगलच! मग, तुम्ही कोणाचा वारसा नेमका चालवताय…कशाला उठसूठ शिवछत्रपतींचे नाव घेता, त्यांच्या नखाची तर सर आहे का तुम्हा लोकांना…??ॽ
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)