उरी, पुलवामा व आता पेहेलगाम…सर्जिकल-स्ट्राईकरुपी, लांडगा आला रे आला!”

२०१६चा काश्मीर ‘उरी’ येथील दहशतवादी हल्ल्यानंतरचा (ज्यात, आपले १९ जवान मारले गेले होते) किंवा २०१९चा बालाकोटमधील पुलवामा-हत्याकांडानंतरचा (ज्यात, ४७ CRPF जवान सरकारी बेपर्वाईने मारले गेले) असे दोन्ही ‘सर्जिकल-स्ट्राईक्स्’…ही केवळ, राजकीय फायदा उठवण्यासाठी म्हणून, मोठ्या लष्करी-कारवाईची उत्तमरित्या वठवलेली सोंगं (Pretence of War for Political Benefit) होती.
२०१६मध्ये आज परराष्ट्र मंत्री असलेले जयशंकरजी जेव्हा परराष्ट्र-सचिव होते…तेव्हा, उरी हल्ल्यानंतरच्या सर्जिकल-स्ट्राईकविषयी संसदेच्या परराष्ट्र-व्यवहार समितीसमोर (PCEA) कबुलीजबाब देताना म्हणाले होते की, “ती कुठली लष्करी कारवाई नसून दहशतवाद-विरोधी एक सामान्य मोहिम होती”… तर, दुसर्‍या बाजुला तेव्हाचे “डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स लेफ्टनंट जनरल रणवीरसिंग दुसर्‍याच दिवशी पत्रकार-परिषदेत म्हणाले होते की, “या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची आम्ही पाकिस्तानला पूर्वकल्पना दिलेली होती व त्याबाबत पाकिस्तानशी समन्वय राखला गेला होता.”
…लक्षात घ्या की, कुठलीही लष्करी कारवाई, ही शत्रूराष्ट्राला कल्पना देऊन वा त्याच्याशी समन्वय राखून होत नसते, हे वैश्विक-सत्य होय!

…तसेच, आजवर केंद्र सरकारतर्फे २०१९च्या बालाकोट सर्जिकल-स्ट्राईकबाबत, पाकिस्तानच्या करण्यात आलेल्या नुकसानीचा पाहणी-अहवाल (Damage Assessment Report) जाहीर करण्यात आलेला नाही…विशेष बाब म्हणजे, भारताच्या ‘बालाकोट’ सर्जिकल-स्ट्राईकनंतर दुसर्‍याच दिवशी; म्हणजे, २७ फेब्रुवारी-२०१९मध्ये पाकिस्तानी हवाईदलाने प्रतिशोधाच्या रुपाने ऑपरेशन ‘स्विफ्ट-रेटाॅर्ट’ करत जम्मू-काश्मीरच्या भारतीय भूभागावर बाॅम्बफेक केली होती (पाकिस्तानचे हे कृत्य म्हणजे, एक युद्धसदृश पाऊलंच होतं, हे भारतीय हवाईदलाने तेव्हा मान्यही केलं होतं)…पण, भाजप-संघीय सरकारने त्यावर पुढे कुठलीच प्रतिक्रियात्मक लष्करी-कारवाई करण्याची हिंमत दाखवली नव्हती…हीच तर खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे, या सगळ्याच सर्जिकल-स्ट्राईक प्रकरणातील!

गेली काही वर्षे आम्ही लष्करी-सज्जतेकडे पुरेसं लक्ष देण्याऐवजी २ हजार कोटींची अयोध्येतील ‘राममंदिर’ उभारणी, अनावश्यक असा संसद-भवन वगैरेच्या नवनिर्माणाचा २० हजार कोटींचा ‘सेंट्रल व्हिस्टा-प्रकल्प’ आणि देशाच्या तमाम सगळ्याच संसाधनाचा ताबा (उदा. विमानतळं, बंदरे, खाण-प्रकल्प, रेल्वे, महामार्ग, पूल-उड्डाणपूल, इतर काॅर्पोरेटीय क्षेत्रे वगैरे वगैरे) सत्ताधाऱ्यांच्या अंबानी-अदानीसारख्या खासमखास बड्या भांडवली-दुढ्ढाचार्यांकडे जाऊन देशाची बेलगाम ‘खाजगी-लूट’ कशी होत राहील…यासारख्या बाबींकडेच आमचं लक्ष केंद्रित केलं!
त्यातून, पगार-निवृत्तीवेतनाचा मोठा पैसा वाचावा म्हणून, गेल्या ३ वर्षात १ लाख ८० हजार कायम लष्करीजवान भरतीच केले गेले नाहीत. त्या जागी तुटपुंज्या पगाराचे ‘अग्निवीर’ नावाचे अर्धप्रशिक्षित नवतरुण ‘कंत्राटी-गुलाम’ म्हणून भरती केले गेले. …परिणामतः, दोन हजाराहून अधिक पर्यटक असलेल्या पेहेलगामसारख्या ठिकाणी सुरक्षा-व्यवस्थाच मौजूद नव्हती. एवढंच नव्हे, तर अनेक जाणकार लष्करी-तज्ज्ञांच्या मते जसे आपण कायम लष्करी जवानांच्या जागी अग्निवीर-गुलाम आणले; तसेच, प्रत्यक्ष लष्करी-कारवाईच्या जागी उठसूठ सर्जिकल-स्ट्राईक, हा उफराटा प्रकार आपण आणलाय. आपली सगळी लष्करी-सज्जताच त्याप्रकारची असल्याने, पाकिस्तान-चीनशी रशिया-युक्रेनसारखं दीर्घकालीन पारंपरिक युद्ध करण्याच्या आपल्या क्षमतेवर मोठ्या मर्यादा आल्यात!

…या पार्श्‍वभूमीवर आपण हे विचारात घेतलं पाहिजे की, “लांडगा आला रे आला” अशी हाकाटी फारतर दोन वेळा देता येते…त्यानंतर, तिचा प्रभाव संपतो. तशीच, सर्जिकल स्ट्राईकद्वारे निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी लष्करी-कारवाईची वठवली गेलेली ‘शिमग्याची सोंगं’ वारंवार उठवता येणं, अशक्य दिसत असल्यानं…दबावाखाली आलेले भाजप-संघीय राज्यकर्ते आता, ‘आखरी-रास्ता’ म्हणून ‘धर्मा’च्या नावाने हाकाटी पिटणारच, हे सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ दिसू लागलंय. सध्या पेहेलगाम घटनेनिमित्ताने बिनडोक-निर्बुद्ध व धर्मविद्वेषी अंधभक्तांना भाजप-संघीय नेतृत्त्वाकडून, “भारताला ‘हिंदूराष्ट्र’ घोषित करण्याच्या व्यक्तिगतस्तरावर असंख्य ऑनलाईन-मोहिमा राबवण्याचा आदेश दिला गेल्याचं समजतंय.”
…त्या आदेशानुसार, हे ‘अंधभक्त मर्कट’, तत्काळ कामाला लागल्याचं समस्त भारतीय जनतेच्या दृष्टोत्पत्तीस येईलच, तेव्हा सावध रहा…धन्यवाद!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)