“आप भारत की राष्ट्रभाषा के बारे में जानना चाहते हैं, मुझे लगता है कि, भारत की राष्ट्रभाषा विविधता में एकता है!” …कानिमोझी
स्वतःला ‘विश्वगुरु’ संबोधणारे (जगात कुणीही हिंग लावून फारसं कुणी विचारत नसतानाही) ‘ऑपरेशन-सिंदूर’बाबत भारताची बाजू मांडण्यासाठी व पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवादाचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी…स्वतः कुठेही न फिरता (कारण, त्या कथित विश्वगुरुची विश्वासार्हता, सततच्या थापेबाजीने देशात आणि परदेशात रसातळाला गेलेली असल्यानेच) एक सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ त्यांनी पाठवलंय.
त्या शिष्टमंडळातील एक गट डीएमके महिला खासदार कानिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्त्वाखाली जेव्हा स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये पोहोचला; तेव्हा जाणिवपूर्वक त्या शिष्टमंडळाला तेथील पत्रकारांनी खोचक प्रश्न विचारला की, “तुमच्या देशाची ‘राष्ट्रभाषा’ काय आहे?”
त्यावर, कानिमोझी यांनी दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आणि सगळ्यांनाच अवाक् करणारं ठरलंय व त्यातून, भाजप-संघपरिवाराने सध्या जगभर आपल्या देशाची जी नाचक्की चालवलीय…त्यावरचा, रामबाण इलाज ठरु पहातोय. जगभरात आपल्या देशाची मान उंचावणारं प्रभावी वक्तव्य करताना कानिमोझी म्हणाल्या, “आपण भारताच्या राष्ट्रभाषेविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहात; तर, मला तुम्हाला हे सांगू द्या की, ‘विविधतेतून एकता’ हीच आमची राष्ट्रभाषा आहे!”
कानिमोझी, एवढ्या उदंड शहाणपणाने अशी मांडणी करत असताना व महाराष्ट्रात पहिल्या यत्तेपासून हिंदी सक्तिची भाषा केली जात असताना…मर्यादित आकलनशक्ति; पण, अमर्यादित राजकीय-आर्थिक स्वार्थबुद्धी असलेली आमची मराठी नेतेमंडळी “हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र” वगैरे शब्दच्छल करत बसलीयत.
‘एक देश, एक भाषा’, ‘एक देश, एक संस्कृती’, ‘एक देश, एक निवडणूक’, वगैरे वगैरे जे अगदी बुलडोझर फिरवल्यासारखे जैववैविध्याने नटलेल्या आपल्या देशाचं, भाजप संघपरिवाराकडून जोरजबरदस्तीने ‘सांस्कृतिक-सपाटीकरण’ सुरु आहे; ते जैववैविध्याच्या नावाने बोंब असलेल्या ‘पाश्चात्य’ अथवा ‘अरबी’ धाटणीचं आहे…ते सपाटीकरण म्हणजे, भारतीय-अध्यात्माचा पायाच उखडून टाकणं आहे. आश्चर्य म्हणजे, “हिंदुत्वाच्या नावाखाली हा सगळा नंगानाच चालू आहे!”
यातूनच पुढे ‘एक राष्ट्र, एक पक्ष’ अशा…चीन-रशियासारख्या ‘हम करे सो कायदा’ नृशंस वृत्तीने जन्म घेतल्यास आश्चर्य वाटायचं कारण नाही.
साधारण पस्तीस वर्षांपूर्वी नव्वदीच्या दशकात ‘खाउजा-धोरण’ (खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण) राबवताना असाच ‘भांडवली-बुलडोझर’ जगभर व देशभरात रोरावत फिरवला गेला होता…त्याच्या भळभळत्या जखमा-वेदना अजूनही ताज्या असताना, चाललेला हा दुसरा घातकी प्रयत्न आहे आणि तो पूर्ण ताकदीने वेळीच उधळून लावला गेला पाहिजे.
…अन्यथा, ‘खाउजा-धोरणा’ने जशी ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ देशभरात लादली जाऊन, एकाबाजुला करोडोंनी गुलामांच्या फौजांची आणि दुसर्याबाजुला त्यांचं रक्तघाम अत्यंत स्वस्तात विकणाऱ्या ‘राजकारणी-कंत्राटदारां’ची देशात प्रचंड सैतानी-पैदास केली गेली…तशी, एकछत्री वा हुकूमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या राजकीय व भांडवली ‘दहशतवाद्यां’ची मूठभर जमात, पिढ्यानपिढ्या देशात बेलगाम धुमाकूळ घालत राहील. वर्णवर्चस्ववादी-शोषक मानसिकतेचे ‘मनोरुग्ण’, मागच्या दाराने पूर्वीसारखीच; पण, सरड्यासारखा काळानुरुप थोडा रंग बदललेली ‘चातुर्वर्ण्य-व्यवस्था’ देशात ‘हिंदुत्वा’च्या गोंडस नावाखाली पुन्हा लादतील…तेव्हा, सावधान!
|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||
(संयुक्त-महाराष्ट्रानंतर ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…शिवछत्रपतीराष्ट्र!)
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)