ही भीषण अवस्था, यापूर्वीही महाराष्ट्रात १६ एप्रिल-२०२३ रोजीच्या खारघरच्या सेंट्रल-पार्कमधील बैठक-संप्रदायाचे सर्वेसर्वा नाना धर्माधिकारी यांच्या कार्यक्रमात दिसली…तिथे डझनावरी भोळ्याभाबड्या जीवांचे प्राण, निव्वळ बड्या राजकारण्यांच्या सोयीसाठी आयोजन केल्या गेलेल्या तेथील ऐन रणरणत्या उन्हातील निर्मम अव्यवस्थेमुळे तडफडून गेले होते. तसेच, २०२५ मधील प्रयागराज (उत्तर प्रदेश) महाकुंभ-मेळ्यातील चेंगराचेंगरीत तर दोन हजारांहून अधिक बळी गेले होते. तरीही, सामान्य जनता अशी का वागते, हे उलगडत नाही. हा कुठला नाद, ही कुठली नशा…ज्यावर, हे सामान्य जीव जगू पहातात? ‘‘जगणं जेवढं जेवढं म्हणून अधिकाधिक कठीण होत जातं; तेवढी तेवढी अशा कृत्रिम नशांची सामान्य माणसाला साधं तगून रहाण्यासाठी आवश्यकता भासू लागते’’…त्या नशेला आपल्या जगण्याचा कृत्रिम आधार बनवून आपलं अवघं जगणंच ही माणसं पिढ्यानपिढ्या नासवून घेत रहातात. या संप्रदायी-धार्मिक वा खेळ-महोत्सवी नशेमध्ये चूर्र राहिल्यामुळे आपल्या आयुष्यात बदल घडवून कायमचं सुखीसमाधानी-सन्मानपूर्वक जगण्यासाठी…रक्तपिपासू-निर्मम-शोषक भांडवली-व्यवस्थेला (Vampire-State System) आव्हान देण्याचं, संघर्ष करण्याचं भान ते हरवून बसतात आणि भांडवली-व्यवस्थेला तर नेमकं तेच हवं असतं; त्यासाठीच, या सगळ्याचं प्रयोजन असतं! सामान्य जनता अशातऱ्हेनं ‘षंढ आणि थंड’ बनल्यानेच भांडवलदारवर्गाला जनतेच्या लुटलेल्या संपत्तीचा व गुन्हेगारी-संगनमताने मिळवलेल्या पाशवी सत्तेचा निर्वेध-अनिर्बंध उपभोग घेता येतो.
…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)