कुठल्याही कंपनीतील कामगार-कर्मचाऱ्यांनी मुद्दामहून वाचावं, असं काही….

१५ जून-२०२५ रविवारचा तो पावसाळी दिवस आणि त्या एकाच दिवशी समस्त कामगारवर्गासाठी अतिशय उद्बोधक, असे दोन कार्यक्रम घडून गेले…आणि, ते होते, एकाच कंपनीतल्या दोन निवृत्त कामगारांच्या संबंधाने…कंपनीचं नाव सुल्झर पंप्स, दिघा (नवी मुंबई) आणि कामगारांची नावं अनुक्रमे प्रफुल्ल मुणगेकर व काशिनाथ वडगावकर.

प्रफुल्ल मुणगेकरचा कंपनीतल्या कामगारांनी आयोजित केलेला निवृत्ती-समारंभ सकाळी होता; तर, काशिनाथ वडगावकर, या दोन वर्षांपूर्वीच निवृत्त झालेल्या गुणी कामगाराचा कौटुंबिक स्वरुपाचा ‘षष्ट्यब्दी’ सोहळा (साठावा वाढदिवस)…त्याच्या ‘वर्षा’ नावाच्या आयटी-उद्योगात अधिकारी असणाऱ्या उच्चशिक्षित पुतणीने खास आयोजित केला होता (त्याचं कारणही तसं खास होतं).

** प्रफुल्ल मुणगेकर हा कामगार जेमतेम १८ वर्षांच्या सेवेनंतर सुल्झरमधून निवृत्त होत असताना (त्याची पूर्वीची कंपनी बंद पडल्याने, सुल्झरमध्ये काम करणाऱ्या त्याच्या भावाने त्याला तिथे ‘हेल्पर’ म्हणून लावण्याची व्यवस्था केली होती), त्याचा पगार तब्बल रु. ८५ हजार होता…खरंतरं *पाच वर्षापूर्वी आलेल्या नव्या ‘कामगारविरोधी’ सुल्झर व्यवस्थापनाने, जुना करार मोडून संघटनेच्या निष्ठावान कामगारांवर घोर अन्याय केल्यामुळे…जो पगार लाखाच्याही वर असायला हवा होता, तो ८५ हजाराच्या भोज्यावर थबकला होता, हे विशेष (ज्याविरोधात, कामगार संघटनेने न्यायालयात दाद मागितलेली आहेच)!

…सांगा, ‘राजन राजे’ या पंचाक्षरी चमत्कारापलिकडे (केवळ, सुल्झरचं नव्हे; तर, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’च्या याच नेतृत्त्वाखालील अनेक कंपन्यांमध्ये थोड्याफार फरकाने असेच घसघशीत पगार / बोनस आहेत), साध्या ‘हेल्पर’ला कुठे असे पगार व लाखाचे बोनस, तेही फक्त १८ वर्षाच्या सेवेपश्चात असू शकतात?

** काशिनाथ वडगावकरच्या रात्रीच्या षष्ट्यब्दी सोहळ्यात भिजल्या डोळ्यांनी, त्या कार्यक्रमाचं अप्रूप कथन करताना वर्षानं (पुतणीनं) सांगितलं की, “माझे वडील लहानपणीच वारल्यानंतर आम्ही सारे उघड्यावर पडलो होतो…तेव्हा, आमचा काका (काशिनाथ), ज्याला आम्ही ‘आबा’ म्हणतो, तो पुढे आला आणि त्याने आपली मुलगी व मी पुतणी, यात जराही भेदभाव न करता दरमहा भरीव आर्थिक मदत करुन आमच्या पालनपोषणाची व शिक्षणाची मोठी जबाबदारी पार पाडली…म्हणूनच मी शिकून आज आयटी-उद्योगात अधिकारीपदावर काम करताना तुम्हाला दिसतेय…’आबा’ या शब्दात माझी ‘आई’ ही आहे आणि माझे ‘बाबा’ देखील आहेत…म्हणून तो माझा ”आ बा’!”

…तो साराच प्रसंग अतिशय भावपूर्ण व हेलावून टाकणारा जरुर होता; पण, पुतणी वर्षा एक गोष्ट मात्र सांगायची विसरलीच की, तिचा ‘आबा’ म्हणजे आमचा ‘काशिनाथ’…हे जे काही महान कौटुंबिक-कार्य करत राहीला; ती आमच्या ‘सेऊ’ (SEU…सुल्झर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियन), या कामगार-संघटनेची मूलभूत व आधारभूत संस्कृतीच होती व आहे…आणि, त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, जो काही भरभक्कम पगार / बोनस ‘सेऊ’ संघटनेमुळे कामगार-कर्मचारीवर्गाला मिळत होता…त्यामुळेच, दोन दोन संसार सावरुन धरणं, काशिनाथसारख्या कामगाराला शक्य झालं. मुळातून काशिनाथच्या या गुणवैशिष्ट्याचं व सहृदयतेचं भरभरुन कौतुक जरुर आहेच…पण, ज्यापद्धतीने गेल्या पाच वर्षांत सुल्झर पंप्सच्या नव्या व्यवस्थापनाने, जबरदस्तीने ”कंत्राटी-कामगार पद्धत’ लादण्यासाठी…नीच-अधम वृत्तीच्या आत्यंतिक स्वार्थी, गद्दार कामगारांच्या फुटीर गटाला हाताशी धरुन…जो आजवर भयंकर उत्पात कंपनीत माजवलाय आणि सगळ्या संकटांना धैर्याने तोंड देत ‘कामगारधर्म’ जोपासणाऱ्या निष्ठावान कामगार-कर्मचारीवर्गाची, जी भयानक ससेहोलपट केलीय…त्यातून, पुन्हा असे नवे ‘आबा’ तयार होणं यापुढे शक्य नाही! उलट, अशा कंत्राटी ‘आबां’ना जेव्हा जेव्हा नोकरीतून काढलं जाईल…तेव्हा तेव्हा, त्यांना व त्यांच्या दरिद्री संसाराला आधार देणारे हात शोधावे लागतील…त्यांच्या ‘बायडी’ला रिक्षा चालवावी लागेल, नाहीतर कुठलीशी कुडमुडी नोकरी शोधावी लागेल…अन्यथा, शासनाची ‘लाडकी (?) बहिण’ म्हणून खात्यात पडणाऱ्या दिडदमडीच्या रकमेकडे चातकाच्या नजरेनं पहात रहावं लागेल!

…पुन्हा असे नवे ‘आबा’ तयार होणं, यासाठी थांबेल; कारण, तुटपुंज्या पगाराच्या ‘कंत्राटी-कामगार’ नावाच्या नव्या ‘आबा’ला, आपल्या स्वतःच्या फाटक्या संसाराची गोधडी शिवता येणे नाही…तिथे तो कंत्राटी-गुलामीत राबणारा व कौटुंबिक प्रेम जपणारा ‘आबा’, आपल्यासोबत मृत भावाच्या संसाराचा गाडा, मनातून कितीही इच्छा असली; तरी कसा काय हाकू शकेल?

“कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ”, या उक्तिनुसार व्यवस्थापनाने दाखवलेल्या आमिषाला अथवा व्यवस्थापकीय धाकदपटशाला (Corporate-Terrorism) बळी पडून “कामगारच कामगारांचा शत्रू वा काळ बनला” की, वेगळं काय घडणार? ज्या कंपनीच्या लोकविलक्षण कार्य-संस्कृतीचा देशभर व देशाबाहेरही बोलबाला होता व जी ‘कार्यसंस्कृती’ इतर कंपन्यांमधील कामगार-चळवळीसाठीही ‘दीपस्तंभा’सारखी काम करत होती; तिच्या अगदी पाऊलखुणा देखील भाडोत्री ‘बाऊन्सर्स’ दिमतीला ठेऊन, पोलिस खातं-कामगार खातं आणि स्थानिक ‘मनगटशहा’ असलेले गुंडपुंड राजकारणी खिशात ठेऊन जोरजबरदस्तीने पुसल्या गेल्या…ज्या कार्य-संस्कृतीवर प्रबंध लिहून ILO (International Labour Organisation) मध्ये पाठवले गेले, प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण; म्हणून अनेक कंपन्यांतील व्यवस्थापकीय-तज्ज्ञांनी (IIM/IIT मधील देखील) प्रत्यक्षात भेट देऊन तिचा अभ्यास केला…ती आज ‘मोहनजोदडो-हडप्पा’ संस्कृतीसारखी नष्टप्राय झालीय! जी कंपनी म्हणजे, हसतखेळतं ‘आनंदाचं गोकुळ’ होतं; त्याच कंपनीत आज स्मशानशांततेला लाजवणारा ‘सन्नाटा’ पसरलाय…कुणाकुणाचं मिळून हे महापातक???

…ज्यांनी ज्यांनी, गद्दारीतून आपलं उखळ पांढरं करुन घेण्यासाठी अथवा आपली स्वतःची कातडी वाचविण्यासाठी, अशा ‘आबां’ची निर्मिती करणाऱ्या जैव-प्रक्रियेच्या गळ्याला नख लावलं…हसतखेळते संसार हकनाक उध्वस्त केले आणि त्यातून, विकृत आनंद मनसोक्त भोगले, त्यांना नियती माफ करणे नाही!

केल्या कर्माचे कर्मभोग ‘याचि देही, याचि डोळा’…या ना त्या मार्गाने, भोगावे हे लागणारच…त्यातून संबंधित, या सगळ्याच नीचात्म्यांची-पापात्म्यांची सुटका नाहीच!

राजन राजे (संस्थापकीय अध्यक्ष : सेऊ‘…SEU आणि धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ‘)