देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीतील अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा…

“फडणवीसांच्या कारकीर्दीत महाराष्ट्राचा ‘उत्तर प्रदेश’ होण्याची प्रक्रिया गतिमान झालीय…फडणवीस हे महाराष्ट्राचे, कायदा धाब्यावर बसवणारे, नवे ‘योगी आदित्यनाथ’ झालेयत का?”
…हे ‘एन्काऊंटर’, केवळ एका आरोपीचं नसून संपूर्ण ‘न्यायालयीन-व्यवस्थे’चं देखील आहेच, हे कसं विसरुन चालेल??
——————————————————————
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपती-दर्शनासाठी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या जाण्यातून…या देशाची न्यायव्यवस्था, भाजप-संघाची ‘बटीक’ झाल्याचा (याचा अर्थ, आताशी न्यायालयातून ‘न्याय’ कमी आणि ‘निकाल’ जास्त मिळतो), जो संदेश जनतेपर्यंत गेला… त्याचीच परिणती, आजच्या बदलापूर लैंगिक-शोषण प्रकरणातील आरोपीच्या, अशा ‘एन्काऊंटर छाप’ घटनांतून ‘न्यायालयीन-व्यवस्थेचा पूर्ण ‘अधिक्षेप’ होण्यात झालीय.
…जर, हे महायुती-सरकार, येत्या निवडणुकीत खाली खेचलं गेलं नाही; तर, यापुढे न्यायालयांनाच धाब्यावर बसवणार्‍या…अशाप्रकारच्या अनेक घटना, क्रमाक्रमाने ‘एकनाथ-देवेंद्र-अजित’ ट्रिपल-इंजिन सरकारकडून होत जातील…देखते रहो!

** संस्थाचालक वगैरे असलेले कुणी आपटे, आठवलेबाई यांना एवढ्या दिवसात अटक करण्यास ‘असमर्थ’ ठरलेले आणि स्वतःची हत्यारे नीट सांभाळू न शकणारे ठाण्याचे नादान पोलिस आणि त्यांचा ‘बाॅस’ असलेलं अवघं गृहमंत्रालय…ही सगळीच एक मोठी अकार्यक्षम व भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा झालीय, देवेंद्र फडणवीसांच्या कारकीर्दीत!
“ना रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी” या न्यायाने, शाळेत जाणिवपूर्वक CCTV न बसवणार्‍या, या सगळ्या संघ-भाजपा समर्थक ‘उन्मत्त पिसाटां’ना वाचवण्यासाठीच तर हा खटाटोप नसणार ना… हा जनतेच्या मनातला रास्त संशय, कोण धसाला लावणार?

** शिवबा-संतांच्या महाराष्ट्राच्या नीतिमत्तेची साफ वासलात लावण्याचं अर्धवट राहीलेलं नरेंद्र मोदी-अमित शहा दुकलीचं नीच कर्म पूर्ण करण्याचा विडाच जणू, शिंदे-देवेंद्र यांनी उचलल्याचं, या निमित्ताने दिसतंय!

** ठाणे-शहर, हे वाहतूक-कोंडीच्या दृष्टीकोनातून ‘मृतप्राय’ शहर (Dying City) झालेलं असताना; तुलनेनं प्रवासी-वहातूक तुरळक असलेल्या ‘मुंब्रा-बायपास’वरच अगदी अचूक ‘एन्काऊंटर’ कसा होतो?

* ठाण्यात अनेक नामचीन गुंड धुमाकूळ घालत असताना…आणि, पोलिसांच्या देखतच राजकीय-कार्यकर्त्यांवर ते गुंड हल्ले करत असल्याची उदाहरणं ताजी असताना… त्यांचे कधि ‘एन्काऊंटर’ झाल्याचं ऐकिवात नाही; उलटपक्षी, कालपर्यंत नामचीन गुंड असलेले अनेकजण, अचानक ‘मुख्यमंत्र्यांचे राजकीय-कार्यकर्ते’ काय बनतात आणि त्यांच्यासोबत, ठाण्यात ‘मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स’ काय चौकाचौकात झळकतात…याचा अर्थ, मतदार म्हणून, जनसामान्यांना कळत नसेल; तर, ते ‘फुकटेपणा’तून ‘जनावरांच्या योनि’त गेल्याचीच आपल्याला समजूत घालून घेण्यावाचून दुसरा पर्याय रहात नाही.

* आरोपीकडून झालेल्या (तथाकथित) गोळीबारात किरकोळ जखमी झालेल्या पोलिसांना शासकीय इस्पितळात न नेता, एका खाजगी पंचतारांकित हाॅस्पिटलमध्येच कसं काय नेलं जातं, ज्यामध्ये ठाण्यातल्या ‘सत्ते-मत्ते’ने बड्या; पण, नीतिमत्तेनं अत्यंत नीच-अधम असलेल्या राजकारण्यांचे मोठे ‘हितसंबंध’ गुंतलेले आहेत आणि आजवर ज्या हाॅस्पिटलसंदर्भात अनेक लुटमारीच्या ‘सुरस’ कथा ठाण्यात सर्रास प्रचलित आहेत?

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)