“हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागे…”

एका गावात संमोहन विद्या जाणणारा एक जादूगार रहात होता. त्याने बऱ्याच मेंढ्या पाळल्या होत्या आणि त्यातील तो रोज एक मेंढी कापून कुटुंबियांसह तो आवडीने फस्त करायचा. कितीही निर्बुद्ध असल्या; तरी, मेंढ्यांच्या हळूहळू ध्यानी यायला लागलं की, “कधि हा तर, कधि तो” असे आपले एकेक मित्र, नातेवाईक दिवसागणिक गायब व्हायला लागलेत. ही भयंकर बाब ध्यानात आल्यावर त्यांनी एकमेकांना सावध केलं आणि त्या जादुगाराची चाहूल लागली रे लागली की, त्या चरणाऱ्या मेंढ्या दूरवर जंगलात पळून जायला लागल्या…

आता मात्र, जादुगाराला मेंढ्या पकडणं फारच अवघड व्हायला लागलं, त्याची मेंढ्यांच्या मागे धावून धावून रोज मरणाची दमछाक व्हायला लागली. थकून एके रात्री झोपला असताना, त्याला अचानक युक्ति सुचली… त्याने दुसऱ्याच दिवशी सकाळी लांबूनच सगळ्या मेंढ्यांना आपल्या संमोहनविद्येनं भारुन टाकलं आणि त्या संमोहित अवस्थेत, तो प्रत्येक मेंढीच्या जवळ जाऊन हळूच तिच्या कानात, तिचं तिचं एकच गोष्ट सगळ्यांना सांगू लागला की, “तू एक सामान्य नव्हे; तर, जगावेगळी अशी एक अद्वितीय मेंढी आहेस आणि म्हणून माझी फार लाडकी आहेस… “मारुन खाण्याचा माझा नियम”, इतर सामान्य दर्जाच्या मेंढ्यांसाठी आहे… त्यामुळे, मी एकवेळ इतर मेंढ्यांना खाईन; पण, तुला मात्र, कधिच खाणार नाही. तेव्हा तू यापुढे, इतर मेंढ्यांचं काहीही झालं; तरी, “तुझ्यावर माझा जीव असल्यामुळे, माझ्यापासून तुला एकटीलाच कसलाही धोका नाही”, या भावनेनं तू अगदी निर्धास्त रहा…. शिवाय, तुम्ही माझ्या भितीने, ज्या जंगलात पळून जात होतात ना; तिथे एक ‘वाघ’ रहातो आणि तुम्हाला खरंतरं त्याच्यापासून धोका आहे.

अशातऱ्हेनं, सगळ्याच मेंढ्या, जादुगाराकरवी संमोहित झाल्याने, आपण “जादुगाराची खास लाडकी मेंढी” असल्याच्या भावनेने प्रत्येक मेंढी हुरळून निर्धास्त झाली…. रोज एकेक मेंढी कमी होतेय, हे डोळ्यासमोर दिसूनही… तशी वेळ आपल्यावर मात्र, कधिच येणार नाही; या आत्यंतिक स्वार्थी व अप्पलपोट्या संवेदनशून्य वृत्तीने, आता तो जादूगार आपल्या अगदी जवळ आला; तरी, त्यातील एकही मेंढी जागची हलेनाशी झाली… दुष्ट जादुगाराचं काम आता अगदीच सोप्पं झालं… त्याला, आता मेंढ्यांच्या मागे धावायला लागत नव्हतं… “जादुगाराची लाडकी मेंढी असल्याच्या” दुर्दैवी भावनेनं, बेफिकीर झालेली एकेक मेंढी जादुगाराच्या अलगद हाती लागत लागत…. अखेर, सगळ्या मेंढ्यांचा यथावकाश विनासायास जादूगाराकरवी चट्टामट्टा झाला!!!

(“कुणाला कुठलं पद दे, कुणाला कुठली खास सवलत दे, खोटा मानमरातब दे किंवा कुणाला कसली तात्पुरती बढती दे”, अशा विविध प्रकारे, एकएका कामगाराला हरभऱ्याच्या झाडावर कसं चढवावं… आणि त्याचबरोबर, “जातिवंत संघटना आणि जाज्वल्य संघटना-नेतृत्त्व” यांना बदमाषीने भयंकर बदनामकरत, त्या दोन्हींपासून कामगारांना अगदी पद्धतशीररित्या कसं दूर नेत, हळूहळू एकेका कामगाराला कसा फशीपाडायचा आणि सरतेशेवटी, सर्वांचाच कसा फडशापाडायचा… यासंदर्भात, जगभरातल्या बऱ्याच व्यवस्थापकीय प्रशिक्षण संस्थांच्या HR/IRविभागामधून शिकवली जाणारी ही, वरील रुपक कथा….)

राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)