भाजप-संघीय ‘बनावटी’च्या “हातच्या कंकणाला, आरसा कशाला”…???

भारतातल्या वाढत्या मुस्लिम लोकसंख्येविषयी RSS च्या स्थापनेपासून जाहीरपणे ठणाणा करणारी ‘ढोंगी’ भाजपाई-संघीय नेतेमंडळी, आज वाढलेल्या लोकसंख्येलाच ‘राजकीय-बक्षिशी’ देऊ पहातायत?
भविष्यात तर हे असे, ‘पुनर्सीमांकन’ वा ‘परिसीमन’ योजनेतहत (Delimitation) केले जाणारे बदल, ‘घटनादुरुस्ती’ने नव्हेच; तर, ‘साध्या कायद्या’ने करण्याचा भाजप-संघाचा अतिशय धोकादायक व नापाक इरादाही त्यात अनुस्यूत आहे!
…या सगळ्या ‘डिलिमिटेशन’च्या प्रयासातून, एक राजकीय ‘मतितार्थ’ सुस्पष्टपणे ध्वनित होतोय की, ‘भाजप’च्या धर्मविद्वेषी-राजकारणात ‘मुस्लिम लोकसंख्येचा वाढता दर’, हा फक्त, एक ‘निवडणूक-जुमला’च होय! …अन्यथा, ते असं काही करु धजावलेच नसते; कारण, त्यातून भाजप-संघीय लोकं नेहमी म्हणतात; तशा, ‘मुस्लिम-जमाती’च्या एकगठ्ठा मतांचा प्रभाव असलेल्या लोकसभा-विधानसभा जागा, नसत्या का वाढल्या?
…ते तर, त्यांना त्यांच्या राजकीय धारणेनुसार व धोरणानुसार बिलकूल चालायला नको ना?? …म्हणजेच, रेटून खोटं बोलणं व वरुन ‘संस्कृत-शब्दां’चा बादरायण वापर करत, धादांत खोटा प्रसार-प्रचार करत रहाणं (उदा. कामगार-चळवळ मुळापासून उखडून फेकू देऊ पहाणाऱ्या “४ काळ्या ‘कामगार-संहितां’चा, ‘कामगार-हिताचे कायदे’ म्हणून अपप्रचार करणे इ.)… हा भाजप-संघीय अजेंडा, अगदीच लाजिरवाण्या पद्धतीने उघडा पडलाय, तो इतका की, आता “हातच्या कंकणाला, आरसा कशाला?”
…शिवाय, जशी निवडणुकीदरम्यान “लाडकी बहीण योजना” मतदारांच्या भेटीला येते; तशीच, आपला खतरनाक दीर्घकालीन ‘राजकीय-स्वार्थ’, कसाही करुन एकदाचा साधून घेण्यासाठी म्हणून…या ‘पुनर्सीमांकना’च्या (Delimitation) विधेयकाला “विधिमंडळातील ‘महिला-आरक्षणा’ची चमचमीत फोडणी द्यायला, भाजप-संघीय मंडळी विसरलेली नाहीतच!

वर्ष-२००९च्या लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या ‘पुनर्सीमांकन’ (२००१च्या जनगणनेनुसार) योजनेपूर्वी (Delimitation)…म्हणजेच, २००९च्या निवडणुकांपूर्वी, शेतीप्रधान ग्रामीण भारत, हा लोकसभा-विधानसभा, या दोन्ही कायदे-मंडळावर आपला बर्‍यापैकी वचक राखून होता… पण, महाराष्ट्राचं वानगीदाखल उदाहरण घेतलं; तर, २००९नंतर “पुणे-मुंबई-ठाणे”, ही विधानसभा-जागांच्या दृष्टीने, एक “२४-३६-२४” (एकूण २८८ जागांपैकी तब्बल ८४ जागा…म्हणजे, जवळपास ३०% जागा) मापाची ‘कोकाकोला’च्या बाटलीसारखी वा एखाद्या मदनिकेसारखी मादक आवृत्तीच बनली; ज्यातून, ग्रामीण महाराष्ट्राचं ‘राजकीय-वजन’ सौंदर्यस्पर्धेतील ‘माॅडेल’च्या सडपातळ बांध्यासारखं कमालीचं घटलं… जे केवळ, ग्रामीण जनतेच्या अहिताचंच नव्हे; तर, महाराष्ट्राच्या निसर्ग-पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून देखील अतिशय हानिकारक ठरलं! ‘कार्बनकेंद्री’ विनाशकारक विकास-प्रकल्पांची बेछूट भरमार, त्यातूनच महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात होऊ लागली, हे विसरुन चालेल?
…आणि, या ‘पुनर्सीमांकना’तून (Delimitation) आता तर, निसर्ग-पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्या व पुढील पिढ्यापिढ्यांच्या भविष्यात अंधाराचं ताट वाढून ठेवणाऱ्या… अति उच्छृंखल व उच्छाद घालणाऱ्या, ‘काँक्रिट-विकासा’च्या नावाने, शहरी दादागिरी व जबरदस्तीला भयंकर ऊत येत जाईल व जेव्हा जेव्हा भविष्यात, हे असं ‘पुनर्सीमांकन’ (Delimitation) नव्याने सहजी होत जाईल; तेव्हा तेव्हा चढत्या भाजणीने व तीव्र गतीने, निसर्ग-पर्यावरणावरचे आघात वाढत जातील! लक्षात घ्या, ही ‘मुं.ठा.पु.रा.ना.’ शहरे-जिल्हे (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर) याअगोदरच, महाराष्ट्राच्या नादान राजकारण्यांमुळे परप्रांतीयांना केव्हाचेच ‘आंदण’ दिले गेलेत… या प्रस्तावित ‘पुनर्सीमांकना’तून (Delimitation) परप्रांतीयांना महाराष्ट्रात, अजूनही नव्याने ‘आवतण’, आपसूक मिळण्याचा व त्यातून त्यांची राजकीय-ताकद ‘वाढता वाढता वाढे’, अशी वाढती रहाण्याचा… केवढा मोठा धोका, महाराष्ट्रापुढती उभा आहे, याचं कुणा मराठ्याला भान आहे…???
‘जागतिक-तापमानवाढी’सारख्या (Global-Warming) पर्यावरणीय महासंकटाच्या पार्श्वभुमीवर केवळ, ‘जल, जंगल, जमीन’च नव्हे; तर, ‘जनसंख्या व जीवनशैली’ देखील नियंत्रित करणारी ‘पंचसूत्री’ अवलंबण्याची नितांत गरज असताना; या अशा ‘पुनर्सीमांकना’तून (Delimitation)…प्रचंड कार्बन-ऊत्सर्जन करणाऱ्या शहरी चंगळवादी-जीवनशैलीला आणि उत्तरेच्या लोकसंख्येच्या विस्फोटाला मोठी चालना मिळून…शिस्तबद्ध व प्रगतीपथावरील असलेल्या दक्षिण-भारतासह महाराष्ट्र व उत्तरपूर्व भारताला चांगल्या वर्तनाबद्दल… भाजप-संघीयांच्या निरर्गल ‘राजकीय-स्वार्था’साठी “एकूण टक्केवारीत कमी लोकसभा-जागा मिळण्याची”, ‘उफराटी’ सजा फर्मावली जाणार आहे…
…तेव्हा, सावध होऊन काळाच्या हाका ऐका!

|| जय महाराष्ट्र, जय हिंद ||

संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’…’शिवछत्रपती-राष्ट्र’!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष…भारतातील पहिलावहिला निसर्ग-पर्यावरणस्नेही ‘हरित-पक्ष’…The First ‘Green-Political Party’ Of India)

वि. सू. : कालपरवापर्यंतचं शेतकरी-आंदोलन असो वा लष्करातील ‘अग्निवीर-योजना’ असो अथवा आजचे ‘४ काळे कामगार-कायदे’ असोत…किंवा (जातधर्मात खोलवर अडकल्याने स्वाभाविकच भाजपचा मोठा राजकीय-प्रभाव असलेल्या) अडाणी-अज्ञानी उत्तर भारताच्या लोकसभा-विधानसभा जागा, दक्षिणेतल्या राज्यांच्या तुलनेनं वाढण्याचा गंभीर प्रश्न असो… तामीळनाडूसह सगळा दक्षिण भारत त्याविरुद्ध आवाज उठवतोय; पण, महाराष्ट्र नेहमीप्रमाणेच शांतच… कारण, अशा सर्वच वेळी उभा ‘महाराष्ट्र’, एकतर पाठकणा जमिनीवर टाकून गाढ झोपलेला असतो अथवा तो शहरी-गल्लीबोळात वा ग्रामीण-शेताडात क्रिकेट खेळत असतो किंवा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव-चैत्रोत्सव, दहीहंड्या, गरबे, भंडारे वगैरे कुठल्यातरी सार्वजनिक-मंडळांच्या उत्सवात दंग असतो; नाहीतर, कुठल्याशा धर्मसंप्रदायातल्या ‘षंढ’ गर्दीतला एक भाग बनलेला असतो…अन्यथा, कुणी कशानिमित्ताने दिलेल्या ओल्यापार्टीत वा कुणाच्या हळदीत दारु पिऊन धिंगाणा घालत असतो…किंवा, त्या धबडग्यातून उरलासुरलेला वेळ गुंड, बदमाष राजकारण्यांकडे आभाळभूत नजर लावून भिकेची झोळी पसरण्यात धन्यता मानून असतो… तेव्हा, तो असा, ‘शिवबा-संतां’चा उरला नसलेला; ‘नादान व निद्रीस्त महाराष्ट्र’ जागा होणे नाही…तसा प्रयत्न करुन पहाण्यापेक्षा, दगडावर डोकं आपटणं, काय हो वाईट…???