“हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत…शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत, मात्र महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही…” इति, देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

… ‘मी परत येईन, मी परत येणार’ फेम उपमुख्यमंत्र्यांच्या वरील उद्गारासंदर्भात, त्यांना समस्त महाराष्ट्रीय जनतेकडून काही विचारणा….

१) ‘शांततापूर्ण आंदोलने जरुर करावीत’, याचा गर्भित अर्थ, “आमच्या मातृसंस्थेची शिकवणच मुसोलिनीच्या धर्तीची ‘काळी टोपी’वाली (कशी, ते वाचकांनीच जाणावं)…तेव्हा, विचारतो कोण, तुमच्या असल्या षंढ-अहिंसक आंदोलनांना?” असा घ्यायचा का?

२) “हिंसक प्रकार घडल्यास पोलिस बघ्याची भूमिका घेणार नाहीत”, याचा दुसरा अर्थ, “कितीही तुमची भूमिका न्याय्य असली, तुमच्यावर ‘व्यवस्थे’करवी कितीही जुलूम-जबरदस्ती, अन्याय-अत्याचार होत असले किंवा ‘व्यवस्थे’करवी तुमचं कितीही अमानुष शोषण होत असलं… तरीही, तुम्ही निषेधात्मक फारतर, कायमच ‘परिणामशून्य’ अहिंसक आंदोलनंच करत रहायची व स्वतःचं फसवं समाधान करुन घेत रहायचं… आणि, याद राखा, जर का सगळे सनदशीर मार्ग खुंटलेले पाहून, ‘आखरी रास्ता’ म्हणून तुम्ही ‘हिंसक’ बनलात; तर मग, आमचं काम अगदीच सोप्पं कराल… इस्रायली पोलिस आणि लष्कर कसं, ‘चुन चुनके’ पॅलेस्टाईनींना गोळ्या घालून मारतं किंवा मनमानी खऱ्याखोट्या आरोपाखाली दीर्घकाळ तुरुंगात डांबतं; तशीच, तुमची गत करुन तुम्हाला मुळापासून संपवण्यात येईल… म्हणजे तुमच्या समस्या, तुमच्यावरचे अन्याय-अत्याचार, तुमचं शोषण वगैरे जे काही आमच्या रक्तपिपासू-निर्मम-शोषक व्यवस्थेकडून (Vampire-State System) चाललंय, असं तुमचं म्हणणं आहे… ते ही आपसूकच संपेल की”, असा घ्यायचा का?

३) “महाराष्ट्रात हिंसेला अजिबात थारा देणार नाही” म्हणता; “तर मग, हिंसेला भारतात नेमका ‘थारा’ कुठे, ते ही उपमुख्यमंत्रीसाहेबांनी सांगावं…भाजपाच्या उत्तर प्रदेशात की, गुजराथमध्ये…???

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)