‘बदला पुरा’, अशा देवाभाऊच्या यूपी-स्टाईल बॅनरबाजीचा ‘हिसाब पुरा’….

** ज्या सरकारने बदलापूर लैंगिक-शोषण प्रकरणातील आरोपीचा ‘एन्काऊंटर’ करवला…त्या सरकारला, ज्या ‘काळी टोपी’धारी कट्टर संघीय राज्यपालाने सत्तेवर बसण्यासाठी आशिर्वाद दिला; त्या राज्यपालांचा तो निर्णय, सर्वोच्च न्यायालयीन निर्णयानुसार घटनाविरोधी…म्हणजेच, गेली अडीच वर्षे सत्तेवर जबरदस्तीने बसवलं गेलेलं एकनाथ-देवेंद्र (अजित पवार, हा इंजिन म्हणून जोडला गेलेला; पण, प्रत्यक्षात निव्वळ एक बघ्याची भूमिका घेणारा ‘डबा’ नंतर जोडला गेला म्हणून) जोडगोळीचं ‘महाराष्ट्र-सरकार’ सरळ सरळ बेकायदेशीर आणि घटनाविरोधी!

** अरुण टिकू हत्याकांडातील आरोपी विजय पलांडेला पोलिसांच्या ताब्यात असताना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपामुळे काही काळापूर्वी ‘निलंबित’ केला गेलेला पोलिस निरीक्षक ‘संजय शिंदे’, थेट डोक्यातच अचूक गोळी मारतो (माजी पोलिस अधिकारी रवींद्र आंग्रेंच्या ‘अनुभवी’ म्हणण्यानुसार एवढं मोठं पाऊल एकट्याने उचलण्याची ‘हिंमत’ या संजय शिंदेकडे नाहीच)…यात, वरुन कोणाच्या तरी आदेशावरुनच, त्याने हे पाऊल उचलल्याचा दाट संशय घ्यायला भरपूर वाव आहेच!

** ज्या ‘देवाभाऊ’चे एन्काऊंटरनंतर अभिनंदनाचे बॅनर्स भाजपच्या भक्तुल्ल्यांनी लावलेत आणि जे कोणी सत्ताधारी राजकीय-प्रवक्ते, एन्काऊंटरच्या बाजुने आपापल्या ‘राजकीय-गाॅडफादर’च्या (अर्थातच, असले बहुतांश ‘गाॅडफादर’, हे हाॅलिवूडच्या ‘गाॅडफादर’ चित्रपटातल्या ‘खलनायका’सारखेच, स्वतःच खतरनाक गुन्हेगार असतात) इशाऱ्यावरुन कुठलातरी ‘महापराक्रम’ केल्यासारखे बेंबीच्या देठापासून ‘गोदी-मिडीया’तून कोकलतायत…त्या ‘देवाभाऊ’चे बदलापूरकर पोलिस, लैंगिक-शोषणाची तक्रार येऊन देखील १२-१२ तास पीडित मुलीच्या पालकांना, ‘वरुन आलेल्या इशाऱ्या’वरुन (कारण, संबंधित शाळा-चालक भाजप-संघाचे स्थानिक कट्टर आधारस्तंभ…जसा, DRDO च्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणातील ‘देशद्रोही व गद्दार’ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर देखील होता) पोलिस ठाण्यात निर्दयपणे व बेजबाबदारपणे बसवून ठेवतात आणि प्रचंड लोकक्षोभानंतरच गुन्हा नोंदवून घेतात; पण, अद्यापही घटनास्थळीचं CTV Footage गायब करणाऱ्या तसेच, शाळेत सरकारी-निर्देशानुसार CCTV न लावणाऱ्या ‘फरार’ संस्थाचालकांना अटक करण्यात अपयशी ठरतात…तेच देवाभाऊचे ‘अकार्यक्षम’ पोलीस, बनावट झटापटीचं खोटं निमित्त करुन झटपट ‘एन्काऊंटर’ करुन आपली बनावट ‘कार्यक्षमता’ दाखवून मोकळे होतात (ज्याबाबत, मा. मुंबई उच्च न्यायालयाने देखील सूतोवाच केलेलं आहे)… याचा काय अर्थ लावायचा?
…या दुर्दैवी घटनाक्रमा दरम्यानच अजून एक चिमुरडी बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं…तिचं पुढे काय झालं?
त्या शाळेत वरपासून खालपर्यंत नेमका काय उत्पात घडत होता, जो कदाचित लपवण्यासाठीच, अटकेतल्या आरोपीला कायमचं ‘शांत’ करण्यात आलं??

सात्विक-संतापापोटी बदलापूर-स्थानकात उत्स्फूर्त आंदोलन करणार्‍या ‘बदलापूरकरां’वर, जी नंतर भयंकर पोलिसी-दडपशाही केली गेली व त्यांच्यावर जाणिवपूर्वक गंभीर गुन्हे नोंदविण्यात आले…त्यातून, गमावलेली बदलापूरकरांची व महाराष्ट्रातील अन्य संतप्त मतदारांची मते मिळवण्याचा, ‘एन्काऊंटर’ हा एक अश्लाघ्य प्रयत्नच होय!
आता, येत्या विधानसभा-निवडणुकीत महाराष्ट्राची जनता (विशेषतः बदलापुरची) ‘सूज्ञ’ आहे की, ‘अज्ञ’… ते एकूणच बदलापूर-प्रकरण आणि “भ्रष्टाचार-बेजबाबदारपणातून सिंधुदुर्गचा कोसळलेला शिवछत्रपतींचा गंजका व तकलादू पुतळा उभारणाऱ्या” देवाभाऊच्या ‘बुलेट’ला ‘बॅलेट’मधून एकदम खणखणीत-संतप्त उत्तर देतात किंवा नाही, यावरुन कळेलच!

…राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)